चितमपल्ली नावाचा चातक उडाला…
1 min read
काल (दि. 18 जून ) मारुती चितमपल्ली या नव्वदी ओलांडलेल्या निसर्गसाधकाचं निधन झाल्याचं वृत्त वाचलं आणि त्यांच्या विषयीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मी लिहायला, वाचायला लागलो ते सत्यकथेचे शेवटचे दिवस होते. 1980 च्या दरम्यानचा हा कालखंड. त्या काळात सत्यकथेत जे ललितलेखन प्रकाशित होत होतं, त्यातले चार लेखक माझे अत्यंत आवडते होते. आनंद यादव, अनंतराव पाटील, अनिल अवचट आणि मारुती चितमपल्ली हे ते चार लेखक होते.
या चौघांची प्रकृती भिन्न, तरी माझी त्यांच्याविषयीची आवड मात्र एकच होती. आनंद यादव अनुभवातून रान मांडत होते. अनंतराव पाटलांच्या ललित लेखनात खानदेश आणि तिथले भिल्ल प्रतिबिंबित होत होते. अनिल अवचट राबणाऱ्यांचे प्रश्न सामाजिक अंगानं पण ललित लेखनातून मांडत होते, तर चितमपल्ली निसर्ग आणि मुक्या जीवांना जीव लावत होते. वेगवेगळ्या प्रकारे लिहिणारे हे सगळेच लेखक मला माझ्या भावविश्वाशी संबंधित वाटायचे. त्यामुळे यांचं सत्यकथेतून येणारं ललितलेखन आणि विविध दिवाळी अंकातून येणाऱ्या त्यांच्या ललितलेखनाची मी उत्सुकतेने वाट पाहायचो.
पुढं चितमपल्ली यांचं ‘जंगलाचं देणं’ हे पहिलं पुस्तक आलं आणि त्यानं मला झपाटून टाकलं. नंतर आलेलं त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचून मी चितमपल्ली यांना पत्र लिहायचो. तेही प्रत्येक पत्राचं फार आपुलकीनं आणि प्रेमानं उत्तर द्यायचे. हळूहळू मीही लिहायला लागलो आणि 1989 पासून माझीही पुस्तकं यायला सुरुवात झाली. मीही माझं लेखन, आपल्या आवडत्या लेखकानं वाचावं म्हणून, माझी पुस्तक चितमपल्ली यांना पाठवू लागलो. प्रत्येक वेळी माझ्या पुस्तकावर चितमपल्ली यांनी मला सविस्तर पत्रंही लिहिलेली आहेत. पहिल्या वेळी मी त्यांना ‘पीकपाणी’ आणि ‘आम्ही काबाडाचे धनी’ ही दोन कवितेची पुस्तकं पाठवली होती. तर दुसऱ्या वेळी मी त्यांना ‘लळा’ आणि ‘गाई घरा आल्या’ ही माझ्या ललितलेखनाची पुस्तकं पाठवलेली होती. या दोनही वेळा त्यांनी दोनदोन पानांची पत्र मला लिहिली. ती पत्र मी खाली दिलेली आहेतच.
माझ्या कविता आणि ललित लेखनात येणाऱ्या निसर्ग निरीक्षणावर त्यांची नजर असायची. आणि या गोष्टीकडं ग्रामीण साहित्यिक आणि मराठी समीक्षक नेमकं दुर्लक्ष करायचे. त्याच गोष्टीचं चितमपल्ली मात्र भरभरून कौतुक करायचे. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांनी माझ्या लेखनाचं संगोपन केलं. मला मायेचा पाखवा देऊन माझ्या लेखनाला प्रेरणा दिली. पीकपाणीमधल्या शेवटच्या टिपांमधून येणारे पक्षीपाखरांचे आणि प्रामुख्यानं टिटवीचे संदर्भ त्यांना प्रचंड आवडलेले होते. त्यांनी एकदा पक्षीसंशोधन करताना कावळ्याविषयी मला काही प्रश्नावली पाठवली होती. माझ्या परिसरातल्या कावळ्यांचं आणि त्यांच्या घरट्यांचं निरीक्षण करून मी ती प्रश्नावली त्यांना भरून पाठवावी असं त्यांनी मला लिहिलेलं होतं.
तीन वर्षांपूर्वी चितमपल्ली सरांच्या सोलापूरमधील अक्कलकोट रस्त्यावरच्या घरी गेल्यानंतर नेमकं याच गोष्टीपासून आम्ही विषयाला सुरुवात केली. आणि या अरण्यऋषीचं अरण्य निरीक्षण त्यांच्या वाणीतून श्रवायला लागलं. कावळ्यावरून विषय निघाला तो हत्तींचा. आणि मग सध्या बस्तरकडून चंद्रपूरकडे आलेल्या हत्तीच्या कळपांच्या वृत्तपत्रात आलेल्या बातम्या वाचून त्याविषयी त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांची निरीक्षणं, त्यांची भाष्ये ही नेहमीच आपल्या ज्ञानात भर घालत आलेली आहे. हत्तीचे स्वभाव, हत्ती माणसांच्या वस्तीत का आले, त्यांना बाहेर काढण्यासाठी नेमकं काय करावं, याविषयीचे त्यांनी सुचवलेले उपाय, या सगळ्याच गोष्टी ऐकताना माणसं आणि सरकार हे का ऐकत नाहीत, असा प्रश्नही मला पडत होता.
हत्ती आपल्या पूर्वजांच्या ठिकाणी शंभर वर्षानंतर येऊन जातात, हे त्यांनी सांगितलेलं निरीक्षण, त्यानिमित्ताने त्यांच्या मेंदूतल्या नकाशा प्रमाण त्या दिशेने जाताना रस्त्यात शेतं लागतात का आणखी काही हे त्यांच्या गणतीत नसतं. ते चालत राहतात त्या दिशेने, ज्या दिशेचा नकाशा त्यांच्या मेंदूत कोरलेला असतो. माणसांचा त्रास होऊ नये म्हणून उपजतच हे हत्ती हा प्रवास प्रामुख्याने रात्रीच्या वेळी करतात. कारण दिवसा नव्याने झालेले महामार्ग, त्यावरून वाहणारी वाहनं आणि माणसांचा त्यांना त्रास होतो. खरंतर जो नकाशा त्यांच्या डोक्यात असतो तो जुन्या जंगलांचा असतो. पण ती जंगलं माणसांनी साफ केलेली असल्यामुळे त्यांच्या नकाशाप्रमाणे ते चुकत नाहीत, पण माणसांच्या चुकांमुळे नाहक चुका त्यांच्या वाट्याला येतात.
या हत्तींना बाहेर काढताना हे लोक एकटा-दुकटा हत्ती पकडून त्याला कुठेतरी नेऊन सोडतात. पण असं करू नये. कारण हत्ती हा कळपानं राहणारा प्राणी आहे. त्याला एकट्याला कितीही दूर नेऊन सोडलं तर तो धावत, धडपडत माणसांना तुडवत, बेभान होऊन आपल्या कळपाकडं येत असतो. त्यामुळे हत्तींचं स्थलांतर करायचं असेल तर त्यांना कळपानंच स्थलांतरित करायला हवं. सगळे हत्ती वेगवेगळ्या वाहनातून एकाच वेळी कुठेतरी नेऊन सोडायला हवेत.
पुढे बोलताना विषय निघाला तो व्यंकटेश माडगूळकर आणि पवनीच्या माधवराव पाटलांचा. या दोघांविषयीही चितमपल्ली यांनी त्यांच्या लेखनात भरपूर लिहून ठेवलेलं आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनीच चितमपल्ली यांना पहिल्यांदा लीळाचरित्राचा परिचय करून दिला. ज्या चंद्रपूरच्या जंगलात चितमपल्ली राहत होते, त्याच भागात घडलेली चक्रधर स्वामींची शशिकरक्षण हे लीळा माडगूळकरांनी चितमपल्ली यांना पहिल्यांदा सांगितली आणि नंतर त्यांना लीळाचरित्र वाचण्याचा आग्रह केला. त्यावेळी त्या परिसरातल्या ऋद्धपूरला जाऊन चितमपल्ली यांनी गोपीराज बाबांची भेट घेतली. तिथून काही पुस्तकं मिळवून महानुभाव पंथांचा परिचय करून घेतला होता.
विषय निघाला म्हणून मीही महानुभावच आहे असं सांगितल्यावर ते म्हणाले, वा ही तर फारच चांगली गोष्ट. एक सांताबाईसाची लीळा मी त्यांना पाठ म्हणून दाखवली. ती ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य मी पाहत होतो. ते फारच प्रसन्न झाले. लीळाचरित्र कसं साधं, सोपं आणि सहजसुंदर आहे, त्याविषयी ते बोलत होते. लीळाचरित्रातला ‘चणा विखो’ या एका लीळेविषयी आमची बरीच चर्चा झाली. त्यावर चितमपल्ली असं म्हणाले की, हा संदर्भ नेमका माझ्याजवळ नाही. तो मला पाठवाल का?
मी परभणीला परत आल्यावर अमरावतीच्या सोनपेठकर महानुभाव यांना फोन करून ते संदर्भ मागून घेतले. माझ्या जवळच्या पुरुषोत्तम नागपुरे यांच्या लीळाचरित्रातली ती लीळा काढून चितमपल्ली सरांना पाठवली. यानिमित्ताने ‘चणा विखो’ या विषयावर आमची बरीच चर्चा झाली. हुळा भाजून खाण्याची एक मजेशीर लीळा या निमित्तानं मी त्यांना सांगितली. ती ऐकून चितमपल्ली मनमोकळे हसले. कारण त्या लीळेतले विनोद निरागस आणि निर्मळ आहेत.
चितमपल्ली अलीकडच्या काळात संपूर्णपणे आयुर्वेदाचाच उपचार घेतात. त्यांचं म्हणणं असं पडलं की, वयाची साठी ओलांडल्यानंतर शक्यतो ॲलोपॅथीची औषधं घेऊ नयेत. आयुर्वेदाचाच उपचार घ्यावा. कारण त्यामुळे तुमच्या शरीराची होणारी हानी वाचते आणि ॲलाेपॅथीच्या औषधांनी शरीराची भयंकर हानी होते. व्यंकटेश माडगूळकर यांनी वैद्य तांबे यांच्याकडे नेलं तेव्हा तिथं ‘चणा विखो’ हा विषय निघाल्याचं त्यांनी सांगितलं. आणि तेव्हापासून आपण हरभऱ्याचे कसलेच पदार्थ खात नाही, असंही सांगितलं. अजूनही आपण मांसाहार केलेला नाही. पूर्ण शाकाहारी आहोत. योगा करतो, व्यायाम करतो, असं ते सांगत होते. तेव्हा त्यांचं वय 93 वर्ष होतं. आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या टेबलवर रामदासांचा दासबोध होता. तोही अगदी बारीक अक्षरातला. तरी चष्मा न लावता तो ते वाचत होते. गेली कित्येक वर्ष मधुमेह असतानाही त्यांनी आपली प्रकृती इतकी उत्तम ठेवलेली होती.
आम्ही जे बोलत होतो त्यातलं कुठलंच त्यांना ऐकू आलं नाही असं झालं नाही. त्यांचे पूर्ण दात अजून शाबूत आहेत. दाढी पांढरी असली तरी डोक्यावरचे केस अजून बऱ्यापैकी काळे आहेत. टक्कल पडलेलं नाही. आवाज खणखणीत आहे. वृद्धत्वाची कुठलीच लक्षणं त्यांच्या 93 वर्ष वयाच्या देहावर दिसत नव्हती. हे एका अर्थानं जंगलातचं देणं आहे, असंच त्यांना वाटायचं. त्यांची वाढवलेली दाढी आणि त्यांचे केस यामुळे आपल्या प्राचीन ऋषीसारखा दिसणारा आणि ज्ञानाच्या तेजाने तळपणारा चेहरा पाहिला आणि टागोरांची, टॉलस्टॉयची आठवण झाली.
लीळाचरित्राचा विषय निघाला तेव्हा आदिवासींची भाषा लीळाचरित्रासारखीच वाटते असं ते म्हणाले. भिंगुरटीच्या दृष्टांताचाही विषय निघाला. महानुभाव साहित्यावर आमचं बरंच बोलणं झालं. जुन्या ग्रंथांमधून येणारे निसर्गाचे संदर्भ आणि चातक, चकोर, हंस हे कवींच्या कल्पनेतले वाटणारे पक्षी, त्यातल्या कवीकल्पना वैज्ञानिक दृष्ट्या कशा खऱ्या आहेत आणि त्या चुकीच्या पद्धतीने समजून घेतल्यामुळे कशा खोट्या वाटतात, त्याचं विवेचन त्यांच्या साहित्यातही आहे आणि त्या दिवशीच्या गप्पातही त्याची उजळणी त्यांनी केली. तसाच टागोर आणि त्यांच्या गीतांजलीमधला निसर्ग याचा विषय निघाला, तेव्हा मी मला माहित असलेली गीतांजली या टागोरांच्या कवितासंग्रहाची जन्मकथा सांगितली. चितमपल्ली म्हणाले, तो माझाही आवडता ग्रंथ आहे. पण त्याचा कुठलाच अनुवाद मला आवडला नाही. म्हणून मी मुळातून गीतांजली वाचता यावी यासाठी बंगाली भाषा शिकलो. संस्कृतमधले निसर्गाचे संदर्भ नेमकेपणानं वाचता यावेत म्हणून याआधी ते संस्कृत भाषाही शिकलेले होते. त्यांची मातृभाषा तेलुगु आहे. मराठीही उत्तम येते. इंग्रजीही चांगलीच आहे. शिवाय बंगालीही ते शिकले. हिंदी तर येतेच. अशा सहा भाषा त्यांना उत्तम प्रकारे येतात. या माणसाच्या जिज्ञासेला अंत नाही.
या भागात टागोर पूर्वी येऊन गेले. त्यांचेही एक बंधू वनाधिकारी होते. कारवारच्या परिसरात ते अधिकारी असताना टागोर सोलापूरला येऊन गेले, यावरही आमची चर्चा झाली. त्यावरूनच शांताबाई शेळके यांचे वडील हेही वनाधिकारी होते, त्यामुळे शांताबाईंना चितमपल्ली यांच्याविषयी एक वेगळी आपुलकी वाटायची, तोही विषय आमच्या गप्पांमध्ये येऊन गेला.
आम्ही त्यांच्याकडे जाऊन एक तास होऊन गेला होता. त्यामुळे या वयात त्यांना फार त्रास द्यायला नको म्हणून मी उठण्याची परवानगी मागितली. तर ते म्हणाले अहो त्रास देणारे खूप येतात, काहीच न वाचून येणारे खूप येतात, नुसतेच फोटो, व्हिडिओ काढणारे खूप येतात, पण तुमच्यासारखे वाचणारे आणि सखोल चर्चा करणारे कोण येतात अलीकडे ? फार कमी. बसा बोलूयात आपण थोडं. आणि आणखी अर्धा पाऊण तास आमच्या कसा निघून गेला ते कळलंही नाही. दीड-पावणेदोन तासाच्या त्यांच्या भेटीने मला खूप खूप समृद्ध केलं.
त्यांच्या लेखनाचा मी सुरुवातीपासून चाहता होतोच. त्यांच्या भेटी होऊ लागल्या तेव्हा प्रत्यक्ष त्यांचाही चाहता झालो. एकदा परभणीत चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही त्यांचा कार्यक्रमही ठेवला होता. तो कार्यक्रम फार अप्रतिम झालेला होता. चितमपल्ली यांची आणि माझी झालेली पहिली भेट मला अजूनही आठवते. नगर जिल्ह्यात श्रीगोंदा या गावी माझे गुरु डॉ. प्रभाकर मांडे यांनी 1992 साली लोकसाहित्य परिषद घेतली होती. तेव्हा चितमपल्ली यांची आणि माझी पहिली भेट झाली. या परिषदेला उद्घाटक म्हणून लोकसाहित्याचे जर्मन अभ्यासक गुंथर सोंथायमर हे आलेले होते. या लोकसाहित्य परिषदेत अनेक थोरामोठ्यांच्या भेटी झाल्या. माझा तो उदयाचा काळ होता.
शेवटचं म्हणून मी त्यांना विचारलं की, आता काय काम सुरू आहे ? तर वृक्षकोशाचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पक्षी कोश, प्राणी कोश, मत्स्य कोश आणि आता हा चौथा वृक्षकोश. या वयातही अथकपणे त्यांचं काम सुरूच होतं. ना तब्येतीची तक्रार ना वयाची तक्रार. महाभारत या ग्रंथातून येणारे आणि आता नष्ट झालेले वृक्ष आणि त्याविषयीच्या पुष्कळ गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. पंधरा खंडाचा इंग्रजीतला वृक्षकोश, भारत आणि त्या भोवतीच्या देशातल्या झाडांची नावं आणि त्यातून काही महाभारतातल्या वृक्षांची पटणारी ओळख याविषयी आमचं बरंच बोलणं झालं.
त्यांच्या पुतण्याचीही मी मुद्दाम ओळख करून घेतली होती. चितमपल्ली आता या पुतण्यांकडेच रहायचे. हा त्यांच्या लहान्या भावाचा मुलगा. तेच आल्यागेल्याचं छान आगत-स्वागत करायचे. त्यांना धन्यवाद देऊन, चितमपल्ली यांच्या पायावर डोकं ठेवून, त्यांच्या जगण्याचा आदर्श मनात साठवून तेव्हा आम्ही निघालो होतो. आता चितमपल्ली नसले तरी त्यांचं लेखन आपणाला पूर्ण आयुष्यभर साथ करणार आहे. ते आता आणखीच उत्कटपणे भावणार आहे. चकवाचांदण कायमच आपणाला कवेत घेणार आहे. अगदी सुरुवातीच्या काळात मारुती चितमपल्ली यांची सत्य हकथेतून येणारे जे उत्कट ललितलेख होते, त्यातूनच पुढं मौज प्रकाशनानं ‘चकवाचांदण’ हे पुस्तक सिद्ध केलं. त्यात मारुती चितमपल्ली यांचं आत्मचरित्रही आहे आणि मारुती चितमपल्ली यांचं महत्त्वाचं निसर्गविषयक लेखनही आहे. मौजेनं त्यांचं हे एकमेव पुस्तक प्रकाशित केलं. पण त्यात मारुती चितमपली यांचं सगळं अभिजात लेखन सामावलेलं आहे. हे पुस्तक कितीही वेळा पुन्हा पुन्हा वाचलं तरी त्याचा कंटाळा म्हणून येत नाही.
💐💐💐💐💐
मारुती चितमपल्ली यांची दोन पत्रे
मोबाईल येण्याआधी पत्र लेखनाचं प्रमाण फार होतं. खूप मोठी, कामात व्यस्त असलेली माणसंही सविस्तर पत्र लिहायची. कारण संपर्कासाठी तेच एक महत्त्वाचं साधन होतं. माझ्या अगदी सुरुवातीच्या काळातील ‘पीकपाणी’ आणि ‘आम्ही काबाडाचे धनी’ या दोन कविता संग्रहांवर व ‘गाई घरा आल्या’ आणि ‘लळा’ या दोन ललित लेखसंग्रहांवर लिहिलेली ही पत्रं आहेत. पहिलं पत्र 33 वर्षांपूर्वीचं आहे तर दुसरं पत्र 25 वर्षांपूर्वीचं आहे. दोन्ही पत्रं लिहिताना चितमपल्ली हे नागपूरचे रहिवासी आहेत. तेव्हा ते निवृत्त झालेले होते.

। 1 ।
प्रति,
श्री. इंद्रजीत भालेराव
सस्नेह नमस्कार
श्रीगोंद्यातील भेटीची आठवण ठेवून अगत्याने आपले दोन्ही काव्यसंग्रह ‘आम्ही काबाडाचे धनी’ व ‘पीकपाणी’ पाठवल्यामुळे आनंद झाला. सोबत पत्रही मिळाले.
कविता मी सहसा वाचत नाही. परंतु ‘आम्ही काबाडाचे धनी’च्या मलपृष्ठावरील काव्यपंक्तींनी माझे अंतरंगाकडे लक्ष वेधले. मी वाचायला सुरुवात केली, एका तासात ते संपविले. आणि माझा आनंद द्विगुणित झाला. खरे म्हणजे त्यात निरामय आनंद होण्यासारखे काही नाही. आहे ती आनंदाच्या मागे दडलेली अपार व्यथा आणि दुःख. या वेदनेमुळेच हे शब्दांचे देणे जन्मास आले.
त्यात आई-वडिलांच्या आठवणी, नायकाचे बालपण, तारुण्य आणि विरागी, विदुरपण आलेले आहे. हे सारे निसर्ग लेण्याच्या कोंदणात असे काही बसवले आहे की, माणूस आणि निसर्ग वेगळा करताच येऊच नये.
माझी आई मराठवाड्यातील. लहानपणी तिच्यासोबत आजोळी अनेक वेळा गेलोय. मामाबरोबर तिथल्या माळरानात भटकलोय. बरीच वर्षे मराठवाड्यात वनाधिकारी होतो. आता इतक्या वर्षानंतर तिथला निसर्ग बदलला नाहीच हे आपल्या कवितेवरून जाणवले. असो.
आपल्या काव्यकथेतून ऋतुचक्राबरोबर निसर्ग चालला आहे. पाखरांचे आणि वन्य प्राण्यांचे उल्लेख आले आहेत. ते सारे अंत:करणापासून निघालेले बोल मला फार आवडले. माणसाचे दारिद्र्य अनेकांनी, अनेक प्रकारे व्यक्त केले आहे. परंतु यातील नायक चिटाच्या अंगरख्यासाठी खडूळीच्या खोप्यातून कापूस जमा करताना जमिनीवर ठेवलेली तिची पिले कुत्री खाते, त्यामुळे व्यथित होतो. गरोदर पत्नीला नदीपार करताना ती पहिलटकरीन बैलाच्या शेपटीला धरते. बैलाची शेपटी सैल सुटून ती वाहत जाते. हतबल झालेला नायक काही करू शकत नाही. निसर्गाचे हे रौद्ररूप आपण नेमकेपणाने शब्दात साकार केले आहे.
खरे म्हणजे ही काव्यकथा नऊ रसांनी युक्त आहे. कवितेतील अशी अनेक स्थळे सांगता येतील. परंतु अशाने त्या कवितेला न्याय देता येईल असे वाटत नाही. आपली सारी काव्यकथाच एखाद्या सुगरणीच्या खोप्यासारखी शब्दशब्दांनी विणली आहे. त्यातील एक एक धागा काढून दाखवणे अरसिकता होईल. या काव्यकथेकडे एक आख्खे घरटे म्हणूनच पाहिल्यावर तिचा खरा अर्थ समजू शकेल, अन्यथा नाही.
आपला,
मारुती चितमपल्ली
नागपूर, दिनांक 3 ऑक्टोबर 1992
…
। 2 ।
प्रति
श्री इंद्रजीत भालेराव
सस्नेह नमस्कार
तुम्ही अत्यंत अगत्याने पाठवलेले ‘गाई घरा आल्या’ आणि ‘लळा’ ही दोन्ही पुस्तके योग्य वेळी मिळाली. मनःपूर्वक आभार. लेखनाच्या अनेक उपक्रमामुळे अलीकडे अवांतर वाचन होत नाही. परंतु तुमची दोन्ही पुस्तके मी आवडीने वाचली व आवडली देखील.
उपनिषदात सत्यकाम जाबालीची कथा आली आहे. आठ वर्षाच्या सत्यकाम गुरुच्या शोधाकरिता अरण्यात फिरत असताना गौतम ऋषीच्या आश्रमात आला. आणि त्यांना म्हणाला, भगवन मला आपणाजवळ शिकायचे आहे. त्याची परीक्षा पाहण्यासाठी गौतमांनी ४०० गाई त्याच्या स्वाधीन केल्या, यांना अरण्यात चरण्यास घेऊन जा व हजार गाई होतील तेव्हा परत ये, असे सांगितले. सत्यकाम अरण्यामध्ये बारा वर्ष राहिला. या लहान मुलाने अरण्यात गाई कशा सांभाळल्या व वाढवल्या याचा तपशील कुठे आढळत नाही. तुमच्या पुस्तकातील ‘गाई घरा आल्या’ व ‘पितांबऱ्या’ व इतरही लेखावरून याची काही प्रमाणात कल्पना येते.
हजार गाई होताच तो आश्रमात परत आला. त्याच्या चेहऱ्याकडे पहात गौतम म्हणाले, सत्यकामा तुला आत्मज्ञान झाले आहे. कुणी शिकवले तुला ? सत्यकाम नम्रपणे म्हणाला, मनुष्याखेरीज इतर प्राण्यांनीच मला शिकविले. पुढे सत्यकाम मोठा प्रख्यात ऋषी झाला.
तुमचे लळा हेही पुस्तक आवडले. लीळाचरित्र मला खूप आवडले होते. म्हणून महानुभाव पंथाचे साहित्य हळूहळू गोळा करीत जंगलात वाचून काढले. कित्येक वेळा वाटले आपणाला असे सहज, सोपे लिहिता येईल काय ? परतवाड्याला असताना अधून-मधून गोपीराज महंतांना भेटायला ऋद्धपुर येथे जायचा. काळी वस्त्रे नेसणाऱ्या महिलांविषयी मी त्यांना जिज्ञासेतून विचारी. परंतु तुमचे लळा वाचल्यावर या साऱ्याचा मला अर्थबोध झाला.
ललित लेखनाच्या द्वारे तुम्ही त्या पंथाची सहज जी माहिती दिली आहे ती अप्रूप वाटली. हे सारे तुम्ही मोठ्या श्रद्धेने, आत्मीयतेने व भक्तीभावाने लिहिले आहे. तुमच्या जडणघडणीचीही ती कथा आहे. हे सारे तुम्हाला पूर्वसंचिताने लाभले असणार. असो.
लोभ आहेच,
वृद्धी व्हावी.
आपला
मारुती चितमपल्ली
नागपूर, 16 मे 2000
🔆 छायाचित्रे – संतोष पेडगावकर