krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

HtBt cotton seeds : एचटीबीटी कापूस बियाणे, विनावाॅरंट शेतकऱ्यास अटक कशी करता?

1 min read

HtBt cotton seeds : महाराष्ट्र सरकारने एचटीबीटी (HtBt – Herbicide Tolerant Bacillus thuringiensis) कापूस बियाणे (cotton seeds) विक्री व वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे कृषी व पाेलिस विभाग राज्यभर कारवाई करीत विक्रेत्यांसह शेतकऱ्यांना (Farmer) अटक करून त्यांच्यावर फाैजदारी गुन्हे दाखल करीत आहे. नागपूर ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने बिडगाव, ता. सावनेर, जिल्हा नागपूर येथील शेतकरी रमेश नत्थूजी घाटोडे यांच्या घरी साेमवारी (दि. 9 जून) दुपारी धाड टाकली. पाेलिसांनी झडती दरम्यान त्यांच्या घरातून 56 हजार रुपये किमतीच्या एचटीबीटी कापूस बियाण्यांची 40 पाकिटे जप्त केली. केळवद, ता. सावनेर पाेलिस ठाण्यात गुन्हे नाेंदवून त्यांना अटक केली. कळमेश्वर, जिल्हा नागपूर येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने त्यांना दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली हाेती. त्यानंतर न्यायालयाने गुरुवारी (दि. 12 जून) त्यांना जामीन मंजूर केला. पाेलिस व कृषी विभागाला न्यायालयाच्या (Court) वाॅरंटशिवाय (Warrant) शेतकऱ्यांच्या घराची झडती (Search Warrant) घेण्याचा, त्यांना अटक (Arrest Warrant) करून पाेलिस काेठडी (Police Custody) अथवा तुरुंगात (Jail) डांबण्याचा अधिकार कुणी दिला?

♻️ लेखी नव्हे ताेंडी माहितीच्या आधारे कारवाई
रमेश घाटोडे यांची जटामखाेरा, ता. सावनेर शिवारात 1.47 हेक्टर शेती आहे. निंदणाला मजूर मिळत नसल्याने तसेच तणामुळे पिकाचे नुकसान व कापसाच्या उत्पादनात घट हाेऊ नये म्हणून त्यांनी कुणाकडून तरी तणनाशक सहनशील (Herbicide tolerant) एचटीबीटी कापूस बियाण्यांची 40 पाकिटे खरेदी केली. पावसाअभावी पेरणीला वेळ असल्याने त्यांनी बियाण्यांची पाकिटे घरी सुरक्षित ठेवली हाेती. याची ताेंडी माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पाेलिस कर्मचाऱ्यांना मिळाली आणि त्यांनी धाड टाकली. विशेष म्हणजे, बियाणे आणि पाेलिस यांचा थेट संबंध येत नाही. रमेश घाटोडे यांच्याकडे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे असल्याची लेखी तक्रार कुणीही पाेलिस (Police) किंवा कृषी विभागाकडे (Agriculture Department) केली नव्हती. पाेलिसांकडे त्यांच्या घराची झडती घेण्याचा किंवा त्यांना अटक करण्याचा न्यायालयाचा वाॅरंटदेखील नव्हता. तरीही पाेलिसांनी हा प्रताप केला.

♻️ या कलमान्वये गुन्हे दाखल व अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिस कर्मचाऱ्यांनी रमेश घाटाेडे यांनी केळवद पाेलिस ठाण्यात नेल्यानंतर सावनेरचे तालुका कृषी अधिकारी साेमनाथ साठे व कृषी पर्यवेक्षक मानकर यांना ठाण्यात बाेलावून घेतले. या दाेघांनी बियाण्यांची पाहणी केली. ते बियाणे प्रतिबंधित एचटीबीटी असल्याचे सांगून साेमनाथ साठे यांनी तक्रार नाेंदविली. त्यामुळे केळवद पाेलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 3(5), पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 7, 15, बियाणे नियम 1968 चे कलम 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि बियाणे (नियंत्रण) आदेश 1983 चे कलम 3 अन्वये गुन्हा नाेंदवून रमेश घाटाेडे यांना अटक केली.

♻️ बियाणे तपासणी अहवालापूर्वीच कारवाई
बियाण्यांचा समावेश आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत करण्यात आल्याने तसेच महाराष्ट्र सरकारने कापसाच्या तणनाशक सहनशील एचटीबीटी बियाण्यांवर प्रतिबंध घातल्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई करण्याचा अधिकार केवळ कृषी विभागाला आहे. कारवाई दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून कृषी विभागाने पाेलिसांची मदत घ्यायला हवी. घराची झडती व बियाणे जप्त ही प्रक्रिया कृषी विभागाने करायला हवी. यासाठी कृषी विभागाने न्यायालयाकडून झडती व जप्तीची परवानगी मागायला हवी. या व राज्यतील इतर एचटीबीटी बियाणे जप्त प्रकरणात कृषी विभागाने या नियमाचे पालन करीत नाही. रमेश घाटाेडे यांच्या घरी जेव्हा पाेलिसांनी धाड टाकली, त्यावेळी कृषी विभागाचा एकही कर्मचारी तिथे हजर नव्हता. पाेलिस रमेश घाटाेडे व बियाणे घेऊन जेव्हा ठाण्यात पाेहाेचले तेव्हा तालुका कृषी अधिकारी साेमनाथ साठे व पर्यवेक्षक मानकर केळवद ठाण्यात पाेहाेचले. बियाण्यांची पाकिटे बघून ते प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे असल्याचे सांगून साेमनाथ साठे यांनी तक्रार नाेंदविली. जप्त केलेल्या बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर शहरातील बियाणे तपासणी प्रयाेगशाळेत (Seed Testing Laboratory) पाठविण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी साेमनाथ साठे यांनी दिली. या बियाणे तपासणीचा रिपाेर्ट कधी येईल, हे सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बियाणे व पाेलिस यांचा थेट संबंध येत नाही. ते बियाणे पर्यावरणाला (Environment) हानीकारक आहे, असा प्रयाेगशाळेचा तपासणी अहवाल (Seed Inspection Report) प्राप्त झाल्यानंतर कृषी व पाेलिस विभागाने कारवाई करायला हवी हाेती. ताेपर्यंत प्रकरण तपासात ठेवायला पाहिजे हाेते. मात्र, कृषी व पाेलिस विभागाने या बियाण्यांचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच संपूर्ण कारवाई करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

♻️ शेतकरी हे बियाणे का वापरतात?
अलीकडे शेतीची कामे करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. निंदण केले नाही तर तणामुळे कापसाच्या पिकांचे 40 ते 60 टक्के नुकसान हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी तणनाशक सहनशील बियाण्यांना प्राधान्य देतात. दुसरीकडे, राज्य सरकार पर्यावरण संरक्षणाचा हवाला देत एचटीबीटी बियाण्यांवर बंदी घातली आहे. सरकारला जर पर्यावरण संवर्धनाची एवढीच चिंता आहे तर त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला पिकांचे निंदण करण्यासाठी राेजगार हमी याेजनेंतर्गत वेळीच पुरेसे मजूर उपलब्ध करून द्यायला हवे. शेतकरी त्या मजुरांना राेहयाेच्या दराने मजुरी देतील.

♻️ बियाणे उत्पादक कंपन्या माेकळ्या का?
कापसाच्या या बियाण्यांमध्ये तणनाशक जनुके टाकण्याचे काम बियाणे उत्पादक कंपन्या करतात. ही प्रक्रिया शेतकरी स्वत: करीत नाही. त्यांना ती करता देखील येत नाही. त्यासाठी लागणाऱ्या सुविधा शेतकऱ्यांकडे नाही. बियाणे तणनाशक सहनशील असल्याने तसेच निंदण करायला मजूर मिळत नसल्याने पिकातील तणाचे व्यवस्थापनासाठी शेतकरी या बियाण्यांचा वापर करतात. बाजार अनेक कंपन्यांचे तणनाशक कमी अधिक दरात उपलब्ध आहेत. मग, राज्य सरकार त्यांच्या कृषी व पाेलिस विभागाच्या मदतीने एचटीबीटी बियाणे व तणनाशक उत्पादक कंपन्यांवर कारवाई का करीत नाही? त्यांच्या उत्पादनांवर बंदी का घालत नाही?

♻️ कारवाई टाळण्यासाठी काय करावे?
खरेदी केलेल्या एचटीबीटी बियाण्यांची बिले शेतकऱ्यांकडे नसतात. किंबहुना; बियाणे उत्पादक कंपन्या व विक्रेते शेतकऱ्यांना बिले देत नाही. विक्रेते माेठ्या प्रमाणात बियाणे साठवून ठेवतात. अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार (Essential Commodities Act) हा दखलपात्र अपराध (cognizable offence) आहे. त्यामुळे कृषी व पाेलिस विभागाला शेतकरी अथवा विक्रेत्यांवर कारवाई करणे साेपे जाते. शेतकऱ्यांनी एचटीबीटी बियाणे खरेदी केल्यानंतर पाकिटांमधून बियाणे काढून घेत पाकिटे वेळीच जाळून नष्ट केले तर ते बियाणे एचटीबीटी आहे किंवा नाही, हे कृषी विभागाला सिद्ध करणे कठीण जाते. बियाणे कृषी सेवा केंद्रांमधून खरेदी करूनच पेरावे, घरी राखून ठेवलेले बियाणे पेरणीसाठी वापरू नये, असा कायदा देशात व राज्यात नाही. बियाण्यांच्या सरकीवरील कापसाचे तंतू नष्ट केलेले असतात. अशावेळी शेतकऱ्यांनी या घराच्या कापसातील सरकी काढून त्यावरील तंतू आम्ही प्रक्रिया करू जाळले, असे ठासून सांगावे. विक्रेत्यांनी देखील हिच काळजी घेतल्यास शेतकऱ्यांसह त्यांनाही कारवाई व आर्थिक नुकसान टाळता येईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!