Power & principle : सत्ता तर मिळविली.. पण तत्त्वाचे काय?
1 min read
Power & principle : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 65 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले. या छायाचित्रात राज्यसभेचे खासदार, माजी केंद्रीय अवजड उद्योग व उड्डाण मंत्री श्री प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र राज्याचे नागरी पुरवठा मंत्री व 28 वर्षांपासून उपमुख्यमंत्रिपदासह अनेक पदभार असलेले विविध मंत्रालय सांभाळणारे देशातील इतर मागासवर्गीयांचे नेते श्री छगन भुजबळ, राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार श्री नारायण राणे, दोनदा खासदार व राज्याचे दोनदा मुख्यमंत्रिपद भूषविलेले 27 वर्षे राज्यात विविध मंत्रिपदे भूषविलेले राज्यसभा खासदार श्री अशोकराव चव्हाण, सहा वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले व 33 वर्षे विविध मंत्रिपद भूषिलेले उपमुख्यमंत्री श्री अजित पवार व 20 वर्षे राज्याच्या विविध मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलेले खासदार श्री सुनील तटकरे यांच्या समवेत राज्याचे तीनदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, नागपूरचे सर्वात तरुण महापौर अशी विविध पद भूषवून राज्याच्या राजकारणात वरील सर्व मान्यवरांच्या विरोधात गेली 30-32 वर्षे सातत्यपूर्ण संघर्ष करून स्वतःचे राजकारण सिद्ध करून राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे श्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र राज्य निर्मिती दिनाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध झाले.
हे छायाचित्र इतर वेळी प्रसिद्ध झाले असते तर त्यात फारसे वावगे ठरले नसते. पण गेली 33 वर्षे ज्यांच्याशी टोकाचा संघर्ष करून सत्ता मिळवली व ती टिकवण्यासाठी ज्या तत्त्वांचे राजकारण केले, ती सर्व तत्त्वे सोडून सत्ता स्वीकारली. याचे प्रदर्शन म्हणजे हा फोटो होता. 33 वर्षे वरील सर्व विभूतींच्या विरुद्ध प्राणांतिक संघर्ष करणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या, भारतीय जनसंघाच्या सामान्य कार्यकर्त्यांना व भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना या फोटोमुळे एकच प्रश्न पडला.

स्वातंत्र्यानंतर हिंदूंची बाजू घेणारा पक्ष म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना झाली. ‘एक देश दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ म्हणत त्यांनी आपल्या तत्त्वासाठी बलिदान दिले. याच जनसंघातून 1977 साली जनता पार्टीची स्थापना झाली. पुन्हा तत्त्वाच्या संघर्षातून 1980 साली भारतीय जनता पार्टी या पक्षाची स्थापना झाली.
भारतीय जनता पार्टी हा तत्त्वावर आधारित पक्ष आहे. कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेऊन पक्षाची बांधणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी कोणतीही व्यक्ती, नेता, कुटुंब यांच्याशी बांधील नसून ती कार्यकर्ता केंद्रीत पार्टी आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रवाद हा तिचा मुख्य धागा आहे. भाजपाने आपल्या पक्षाच्या घटनेत पाच मार्गदर्शक तत्त्वांना महत्त्व दिले असून, त्यांना ‘पंच निष्ठा’ असे म्हटले आहे.
राष्ट्रवादासाठी वचनबद्धता, लोकशाहीशी वचनबद्धता (यात काही त्रुटी असल्या तरी) भारतीय लोकशाही पद्धतीत काही त्रुटी असल्याचे ठाम मत भारतीय जनता पार्टीचे आहे. गांधीवादी समाजवादाची वचनबद्धता (सामाजिक व आर्थिक मुद्यावर गांधीवादी दृष्टीकोन), सर्वधर्मसमभाव आणि शेवटचे पाचवे तत्त्व मूल्यांवर आधारित राजकारणाची वचनबद्धता. पाचवे तत्त्व हे मूल्यावर आधारित राजकारण असून, या तत्त्वाशी पक्ष कधीही तडजोड करणार नाही, असा पवित्रा ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे म्हणवून घेणारी भाजप आपल्या प्रचारात नेहमीच करत असते.

भारतीय जनसंघाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे आदर्श असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तत्त्वासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. 1984 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला लाभलेल्या प्रचंड सहानुभूतीच्या लाटेत भाजपाला दोनच जागा मिळाल्याने पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिला होता.
1996 ला भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून निवडून आल्याने त्यांना सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणावरून अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापन केले. या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस बहुमतास केवळ एक मत कमी पडले. या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेले भाषण हे भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात अतिशय सुंदर भाषण असा त्याचा उल्लेख करण्यात येतो.
‘माझ्यावर सत्तेची लालसा आणि सत्तेत राहण्यासाठी जे करावे लागते ते करण्याचा आरोप होत आहे… पण मी यापूर्वीही सत्तेत आहे सत्तेसाठी मी कधीही अनैतिक कृत्ये केलेली नाही…’ ‘जर राजकीय पक्षांना तोडणे हा सत्तेत राहण्याचा एकमेव मार्ग असेल तर ते मी कधीही करणार नाही…’ असे सांगत अटल बिहारी वाजपेयी यांनी तत्त्वासाठी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. तत्त्वासाठी बलिदान व त्याग ही भारतीय जनता पार्टीची खरी ओळख आणि ताकद आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांना तत्त्वासाठी राजीनामा देणारे पंतप्रधान म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने नंतर 13 महिने व नंतर पूर्ण काळ सरकार चालविले.
2004 ते 2014 या काळात काँग्रेसच्या नेतृत्वात देशात व राज्यात स्थापन झालेल्या सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भारतीय जनता पार्टीने रान उठविले. देशभर काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनमत तयार केले. त्याचा परिणाम म्हणून 2014 मध्ये महाराष्ट्रातील विधानसभेत भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक म्हणजे 122 जागा निवडून देऊन युती सरकारला बहुमत दिले. अनपेक्षितपणे गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर संघ स्वयंसेवक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. 2014 ते 2019 या पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणाला साजेसे सरकार चालविले. पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे नुसते आरोप झाले तरी त्यांना पदावरून दूर सारून भ्रष्टाचार सहन करणार नसल्याचे दाखवून दिले. देवेंद्र फडणवीस यांचा पहिला कार्यकाळ पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अतिशय उत्तम व जनताभिमुखच होता यात काही शंका नाही.
2019 साली भारतीय जनता पार्टीला 105 तर सहकारी शिवसेनेला 56 जागा मिळून युती पुन्हा बहुमतात आली. पण शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावर अडून बसल्याने सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली व अचानकच 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली व भारतीय जनता पार्टीच्या तत्त्वावर आधारित राजकारण या पाचव्या प्रमुख तत्त्वाला तिलाजंली दिली. पुढे ते बहुमत सादर न करू शकल्याने तीनच दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी मिळून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.
उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सक्षम व प्रभावीपणे काम सुरू केले. पुढील अडीच वर्षे हे काम असे चालू ठेवले असते तरी त्यांना स्पष्ट व पूर्ण बहुमत सहजच मिळाले असते. एवढ्या चांगल्या पद्धतीने ते विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम करत होते. उद्धव ठाकरे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरविण्यात देवेंद्र यशस्वी झाले होते. असे असतानाही जून 2022 मध्ये एका सायंकाळी शिवसेनेत बंड झाले व शिवसेनेचे आमदार सुरत मार्गे गुहावटीला गेले. उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून उद्धव सरकार पाडले व एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अतिशय पडलेल्या चेहऱ्याने देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. हेच कमी होते की काय म्हणून जुलै 2023 मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून अजित पवार बाहेर आले व देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनाही शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी करून घेतले.
या पार्श्वभूमीवर ‘राजकीय पक्षांना तोडणे हा सत्तेत राहण्यासाठीचा एकमेव मार्ग असेल तर ते मी कधीही करणार नाही’ हा भारतीय जनता पक्षाचे संस्थापक नेते पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा ‘माईक ड्रॉप’ क्षण सतत आठवत राहतो. ज्या ज्या वेळी भारतीय जनता पक्षाचा इतिहास लिहिला जाईल, त्या त्या वेळी तत्त्वासाठी बलिदान देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेत पक्षाला फक्त दोनच जागा मिळाल्या म्हणून राजीनामा देणारे पक्षाचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान पदासाठी फक्त एकच मत कमी पडत असतानाही कोणतीही तडजोड न करता हसत व टाळ्यांच्या गजरात पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे अटल बिहारी वाजपेयी तर 23 नोव्हेंबर 2019 ला पहाटेच अजित पवारांसोबत शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस, जून 2022 ला शिवसेना फोडून शिंदे सरकारमध्ये सामील झालेले फडणवीस, 2 जुलै 2023 ला अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेणारे देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख इतिहासात कायमच सत्तेसाठी पक्ष फोडणारा नेता म्हणून केल्या जाणार आहे. सत्तेत राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सगळी तत्त्व पणाला लावली.
🎯 आता सांग देवेंद्रा,
🔆 बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या उद्धव ठाकरे विरुद्ध महाराष्ट्रात तीव्र जनमत तयार होत असताना पहाटेच उठून अजित पवारांसोबत सरकार का स्थापन केले?
🔆 विरोधी पक्ष नेता म्हणून कारकीर्द चांगली बहरत असताना व उद्धव सरकार सर्व पातळीवर नापास होत असताना शिवसेना फोडून शिंदे सरकार स्थापन करून पडलेल्या चेहऱ्याने उपमुख्यमंत्री का झालात?
🔆 शिंदे सरकार पूर्ण बहुमतात असताना कोणतीही आवश्यकता नसताना अजित पवारांना फोडून सरकारमध्ये सामील का करून घेतलेत?
या प्रश्नांची उत्तर माहीत असून दिली नाहीत किंवा खोटी उत्तर दिलीत तर महाराष्ट्रातली जनता कधीच माफ करणार नाही.
क्रमशः…….
देवेंद्र पंचविशी