Focus on agriculture : सतरंज्या उचलनं थांबवा! ‘एकच पक्ष शेतीवर लक्ष’
1 min read
Focus on agriculture : दिवाळीचा काळ आहे, पण यावर्षी प्रकाश नाही. पावसाने दिवाळीचं दिवाळं काढलं. द्राक्षबागांमध्ये घडंच निर्माण झाले नाही, सोयाबीन जमिनीतच सडले, कापूस काळवंडला. शेतात मेहनत करणारा शेतकरी थकून बसला आहे. त्याच्या चेहऱ्यावर ओढलेलं थकलं स्मित आणि डोळ्यांत साठलेली असहाय्यता दिसतेय. बाजारात शेतमालाला भाव नाही, सरकारी वचनांची पानं उडून गेलीत आणि मातीवर विश्वास ठेवणारा शेतकरी पुन्हा मातीशी बोलतो आहे -‘पुन्हा उभं राहू का आपण?’
पण हाच तो काळ आहे, जेव्हा गावागावात रंगीबेरंगी झेंडे फडकू लागतात. निवडणुका आल्या की, प्रत्येक कोपऱ्यावर आवाज उठतो, सभा होतात, घोषणा दिल्या जातात. तरुणांच्या हातात कोयत्याऐवजी सतरंज्या येतात, अंगावर उत्साहाचा ज्वार असतो, पण दिशाभूल झालेली ऊर्जा असते. या सगळ्या गर्दीत मात्र शेताची ओसाड जमीन कुणालाच दिसत नाही. ती जमीन ज्यावर आपल्या वडिलांनी आयुष्य झिजवलं, त्या मातीतूनच आपली दुनिया उभी आहे, पण त्या मातीकडे वळायला वेळ नाही.
आज सर्वात मोठं आव्हान पावसाचं नाही, बाजारभावाचं नाही, तर दिशा हरवलेल्या तरुणाईचं आहे. शेतीची मुलं आज सभांमध्ये घोषणा देतायत, पण शेतात कोणी उरलं नाही. बाप शेतात उभा आहे. हातात तुटलेला फावडा, चेहऱ्यावर काळजीची रेषा आणि मनात एकच प्रश्न, ‘माझं लेकरं कुठं गेलं?’ तो विचारतोय, ‘यावर्षी रब्बीचा सीझन कसा काढू?’ त्याच्या पाठीवर हात ठेवणारा, मातीला हात लावणारा आणि घरातला दिवा पुन्हा लावणारा कोणी तरी हवा आहे आणि तो कोणी वेगळा नाही, आपणच आहोत.
अवकाळी पावसाने कंबर मोडली, पण मन मोडू नका. शेतीचं चक्र थांबत नाही. या जमिनीला पुन्हा जीव द्यायचा असेल, तर आपल्यालाच द्यावा लागेल. आपल्या हातात ड्रोन शेतीचं तंत्र आहे, सिंचनाचं नवं विज्ञान आहे, बी-बियाण्यांचं सुधारित ज्ञान आहे. मग आता झेंडे उचलण्यापेक्षा बीज उचलूया, घोषणांऐवजी नांगर फिरवूया. राजकारणात हात घालणं सोपं आहे, पण शेतीत हात घालणं हेच खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे. या देशात शेतकऱ्याचा घामच अन्न बनवतो, पण त्या घामाला कधीच सन्मान मिळाला नाही. तो सन्मान आता आपण मिळवायचा आहे. प्रत्येक तरुणाने ठरवावं ‘माझा पक्ष एकच, माझं ध्येय एकच आणि माझं लक्ष एकच – शेती.’ कारण शेती वाचली तर समाज वाचेल; शेतकरी उभा राहिला तर देश उभा राहील.
निवडणुकीचा सीझन येतो आणि जातो. नेते येतात, भाषणं करतात, वचनं देतात आणि विसरतात. पण शेतकरी? तो कुठेही जात नाही. तो पावसात, उन्हात, कर्जात, आशेच्या आडोशात उभा राहतो. कारण त्याला माहिती आहे, माती सोडली, तर सगळं संपेल. म्हणून आज गरज आहे – पक्षनिष्ठेची नाही, मातीनिष्ठेची. आपण आपल्या बापाला पुन्हा उभं करू शकतो, पण त्यासाठी हात मातीला लावावा लागेल, फोनला नाही. आपल्या गावात सभेऐवजी शेतात भेटूया, भाषणाऐवजी पेरणी करूया, बॅनरऐवजी ताटात अन्न उभं करूया. कारण आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत, आणि आपल्या रक्तातच मातीचा सुगंध आहे.
यावर्षी दिवाळी अंधारी असेल, पण उद्याचं पीक उजळ असू शकतं. जर आपण आज निर्णय घेतला, की आता सतरंज्या थांबवायच्या आणि शेतीवर लक्ष द्यायचं. आपल्या बापाच्या डोळ्यांत पुन्हा तेज यावं, त्याच्या अंगावरचा फाटका शर्ट पुन्हा अभिमानाचा झेंडा व्हावा, त्याच्या घामाचा सुगंध पुन्हा समृद्धीचा वास घ्यावा, यासाठी कोणतीच सभा लागणार नाही, फक्त एक निर्णय लागणार आहे, ‘आपला पक्ष एकच – शेती. आपलं लक्ष एकच – शेती!
🤝 ही मैत्री विचारांची