Farmer suicide : शेतकरी आत्म’हत्या’ आणि जर्मनीतील यहुदींचा छळ!
1 min readदेशातील 150 कोटी लोकांची भूक भागवायची ऐपत भारतीय शेतकऱ्यांशिवाय जगात दुसऱ्या कुणाकडेच नाही. कष्ट करून उत्तर आयुष्यात स्वतःला जीवन जगता ना येणे आणि त्यातून आत्महत्येचा मार्ग पत्करणे ही भारतीय शेतकऱ्याची जीवनपद्धती बनली आहे. भलेही शेतकरी मरताना आपल्या व्यथा शब्दात व्यक्त करू शकत नसेल. त्यांच्याकडे योग्य शब्द भांडार नसेल. पण, त्याचा आत्मा मरताना कुणाला न कुणाला श्राप देऊन मरत असेल किंवा स्वतःला अथवा मानव जातीला याबाबत जबाबदार धरत असेल. त्याचा सराप (श्राप) एक ना एक दिवस खरा ठरून सबंध मानव जात अडचणीत येईल. भारत सरकारने आतापर्यंत पाच लाख शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. हा आकडा लहान नाही. अजूनही शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. देशातील लोकांचा वाईट काळ येऊ घातलाय, हे निश्चित!
शेतकऱ्यांना आपल्या शेतात पेरणी आधी शेतीची मशागत करायची. पेरणी करायची पिकांचे संगोपन व जोपासना करायची, काढणी करायची, आठवण करून बाजारपेठेत धान्य घेऊन जाईपर्यंत शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी व्यवहार करावा लागतो. तोही प्रत्येकाच्या फायद्याचा. या गतीला ट्रॅक्टरसाठी ट्रॅक्टर मालकाच्या आवश्यकते इतके पैसे द्यावे लागतात. पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते, संगोपनासाठी लागणारे किटकनाशके व इतर कृषिनिविष्ठा, यासाठी लागणारे मनुष्यबळ या सर्वांसाठी व्यावहारिक हिशोब चुकता करावा लागतो. काढणीसाठी ही मनुष्यबळ आणि अवजारे लागतात. त्यांचाही व्यावहारिक हिशोब द्यावा लागतो. कसे काय सरकारी कंपनी असलेली ‘एमएसइसीडीएल’ला व्यावहारिक हिशाेब देऊन हीच खरेदी करावी लागते. अन्यथा ते वीज कलेक्शन कापतात.
शेवटी बाजारात धान्य नेल्यावर त्या धान्यावर शेतकऱ्याने किती खर्च केला, याचं कुठलंच गणित लावायचा शेतकऱ्याला अधिकार नाही. शेतकऱ्याने तितकीच पैशे निमूट घेऊन घरी यावे लागते. जितके बाजारात खरेदीदार द्यायला तयार असेल. एक दिवस नाही, या भारतीय सुंदर स्वातंत्र्याने शेतकऱ्याला दिलेली ही मोठी समस्या आहे. यालाच स्वातंत्र्य म्हणायचं असेल, यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर जगाच्या पाठीवर असे स्वातंत्र्य आणि अशी लोकशाही कोणत्याही देशात येऊ नये. आपण कधीच हिशोब ठेवायचा नाही, पण आयुष्यभर लोकांना मात्र हिशाेब द्यायचा. या पद्धतीने आयुष्यभर जीवन जगणे नाही, तर व्यवहार चालवणे कसे शक्य होईल.
भारतीय शेतकऱ्यांचा हाेणारा हा छळ अॅडाल्फ हिटलरने जर्मनीतील यहुदी लोकांवर केलेल्या छळापेक्षा अधिक भयंकर आहे. अॅडाल्फ हिटलरला यहुदी लोकांविषयी कुठलीही संवेदना नव्हती आणि त्याला पश्चातापही नव्हता. जर्मनीत सुदैवाने एकच हिटलर होता. पण, भारतात मात्र हजारो अॅडाल्फ हिटलर आहेत. ते ही दर पाच वर्षांनी बदलत असतात (आमदार, खासदार, मंत्री). नव्या उमेदीने नव्या उत्साहाने कामाला लागतात आणि शेतकरी संपवण्याचा जोरदार प्रयत्न करतात. भारतीय शेतकऱ्यांपेक्षा कबिले सुखी असतील. कारण शेतकऱ्यांच्या आयुष्यात कुठलेच स्थैर्य नाही. त्यांच्या वाट्याला आयुष्य आले म्हणून तो जगतोय.
भारतीय राज्यघटनेत घुसडलेले शेतकरी विरोधी कायदे म्हणजे अॅडाल्फ हिटलरचे गॅस चेंबर्स आहेत. हिटलरने लाखो यहुदी मारले, त्याकाळी मरणाऱ्या कैक किंवा प्रत्येक दुसऱ्या यहुदीला कळत नसेल आपण का मरतोय? आपल्यावर ही वेळ का आली? बरोबर तसेच भारतीय शेतकऱ्यांना सुद्धा आज आपल्यावर ही वेळ का आली? हे कळत नाही. पण जर्मनीतील नरसंहार जसा पूर्वनियोजित होता, तसा आज भारतातील होणारा शेतकऱ्यांचा हा आत्महत्यारुपी नरसंहार पूर्वनियोजित आहे. म्हणूनच राज्यघटनेतील शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत.
कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग) कायदा (Ceiling Act).
अत्यावश्यक वस्तू कायदा (Essential Commodities Act).
जमीन अधिग्रहण कायदा (Land Acquisition Act)… रद्द करा!