krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

किडींमुळे अन्नसुरक्षा धाेक्यात

1 min read
किडींमुळे भारतातीलच नव्हे तर, संपूर्ण जगातील विविध पिके अर्थात अन्नसुरक्षा धाेक्यात आल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. हवामानातील प्रतिकूल बदल आणि वाढलेल्या प्रतिकारशक्तींमुळे साध्या व आंतरप्रवाही तसेच साैम्य व जहाल कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या फवारणीमुळे किडी व राेग नियंत्रणात येण्याऐवजी त्यांचा मानवी आराेग्यावरच विपरित परिणाम हाेत आहे. या किडी व राेगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही देशांनी जैवतंत्रज्ञान व 'जेनेटिकली माॅडिफाईड' (जीएम) तंत्रज्ञानाची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्या देशातील अन्नसुरक्षा किडींमुळे धाेक्यात आली असताना आपले राज्यकर्ते व विराेधी पक्षातील नेते स्वतःचे व कीटकनाशके उत्पादक कंपन्यांचे आर्थिक हित जाेपासत अनुत्पादक बाबींवर राजकारण करण्यात व त्यातून एकमेकांवर कुरघाेडी धन्यता मानत आहेत. दुसरीकडे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत भारतीय शेतकरीदेखील फारसे जागरूक नाहीत. किडींमुळे पिके नष्ट हाेत असल्याने शेतकऱ्यांना ती शेतातच जाळावी लागत आहे किंवा त्यावर राेटाव्हेटर फिरवाव लागत आहे. दुर्दैवाने याचे वैषम्य कुणालाही वाटत नाही.

अलीकडच्या काळात लष्करी अळी, अमेरिकन लष्करी अळी, खाेडकिडा, चक्रीभुंगा, उंटअळी, पाने खाणारी व गुंडाळणारी अळी, केसाळ अळी, तुडतुडे (पांढरा, हिरवा, तपकिरी), मावा, पांढरी माशी, खाेडमाशी या किडींसाेबतच मूळकुज, येल्लाे माेझॅक, तांबेरा, ब्राऊन फ्रुट राॅट तसेच करपा, कडा करपा, टाेबॅकाे लीफ कर्ल व्हायरस, कपाशीवरील लाल्या यासह इतर किडी, बुरशी व विषाणूजन्य राेगांमुळे कपाशी, साेयाबीन, मका, धान (भात), भुईमूग, ज्वारी, ऊस, भाजीपाल्याची पिके, संत्रा, माेसंबी व इतर फळपिकांचे दरवर्षी प्रचंड नुकसान हाेत आहे. यात काही बहुभक्षी व बहुवार्षिक किडी आणि बुरशी आहे. या किडी व राेगाच्या नियत्रंणासाठी महागडी किटकनाशके, बुरशीनाशके व इतर औषधांच्या वापरामुळे एकीकडे पिकांचा उत्पादनखर्च वाढत असून, नुकसान हाेत असल्याने उत्पादन घटत आहे. दुसरीकडे, फवारणी करताना विषबाधा हाेत असल्याने शेतकरी किंवा मजुरांचा मृत्यू हाेत आहेत. शिवाय, शेतमालाला बाजारात समाधानकारक भाव मिळत नाही.

साेयाबीनच्या पिकात ‘राेटाव्हेटर’

काही वर्षांपासून देशभरातील साेयाबीनची प्रति हेक्टरी उत्पादकता कमी हाेत चालली आहे. साेयाबीनच्या पिकावर खाेडकिडा, चक्रीभुंगा, येल्लाे माेझॅक व इतर किडींचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना पिकाची कापणी करण्याऐवजी त्यात ‘राेटाव्हेटर’ चालवून शेत साफ करावे लागले. काहींनी पिकाची कापणी केली. पण, त्यांना एकरी दाेन ते तीन क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन झाले नाही. किडींमुळे साेयाबीनच्या दाण्यांचा आकार ज्वारीएवढा बारीक झाला आहे.

धानाचे पीक जाळले

धानाच्या (भात) पिकावर शेवटच्या टप्प्यात तुडतुमड्यांचा प्रादुर्भाव झाला. फवारणी करूनही तुडतुडे नियंत्रणात न आल्याने वडेगाव, ता. माेहाडी, जिल्हा भंडारा येथील ईश्वर माटे, माेरगाव, ता. माैदा, जिल्हा नागपूर येथील साेमा निंबूरकर या शेतकऱ्यांनी कापणी करण्याऐवजी धानाचे पीक शेतातच जाळणे (नोव्हेंबर 2020 मध्ये) पसंत केले. ज्यांनी मळणी केली त्यांना एकरी 25 ते 35 हजार रुपयांचे नुकसान साेसावे लागले. कधी कडा करपा तर कधी तुडतुडे धानउत्पादकांच्या पाचवीला पुजले आहेत.

संत्रा, माेसंबी व ‘ब्राऊन फ्रुट राॅट’

‘ब्राऊन फ्रुट राॅट’ या बुरशीजन्य राेगाच्या प्रादुर्भावामुळे आधी मासंबी व नंतर संत्राच्या अंबिया बहाराची फळे गळाल्याने प्रचंड नुकसान झाले. रात्रभरात शेकडाे टन फळगळती झाल्याने तसेच त्यावर वेळीच याेग्य उपाययाेजना करणे शक्य न झाल्याने संत्रा व माेसंबी उत्पादकांना जबर फटका बसला आहे.

इतर पिके व किडी

गुलाबी बाेंडअळीमुळे कपाशी, मुळकुजमुळे साेयाबीन व हरभरा, लष्करी व अमेरिकन लष्करी अळी तसेच उंटअळीमुळे मका, साेयाबीन, व इतर पिके, बुरशीजन्य राेगांमुळे मूग, उडीद, साेयाबीन, तांबेऱ्यामुळे गहू व साेयाबीन, घाटेअळीमुळे हरभरा तर विषाणूजन्य राेगांमुळे बहुतांश पिके उद्ध्वस्त हाेत असल्याचे प्रकार दरवर्षी घडतात. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असूनही त्यावर प्रभावी उपाययाेजना केल्या जात नाहीत.

‘जीएम सीड’ एक पर्याय

भारतात 50 वर्षांपासून हायब्रिड व त्यावरील संशाेधित वाणांचे बियाणे पेरणीसाठी वापरले जात आहे. या बियांण्यांमध्ये किडी व राेग यांचा प्रतिकार करण्याची शक्ती राहिली नाही. जगात यातील काही किडी व राेगांना प्रतिकार करणारी काही पिकांचे वाण ‘जेनेटिकली माॅडिफाईड’ (जीएम) तंत्रज्ञानाने विकसित केली आहेत. ते मानवी आराेग्यास हानीकारक नसल्याचेही चाचणीदरम्यान सिद्ध झाले आहे. या वाणांमुळे उत्पादनखर्च कमी हाेऊन उत्पादन वाढल्याचेही सिद्ध झाले आहे. ‘बीटी काॅटन’च्या रुपाने भारतीय कापूस उत्पादकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. भारतात ‘जीएम सीड’च्या वापरावर केंद्र सरकारने बंंदी घातली आहे. देशभरातील समाजवादी व पर्यावरणवादी ‘जीएम सीड’ मानवी आराेग्यास हानीकारक असल्याचा प्रचार करीत आहेत. पण, ते हानीकारक कसे आहे, हे मात्र सिद्ध करून द्यायला तयार नाही. राजकीय नेते, बुद्धीवादी मंडळी व काही प्रमाणात शेतकरी या पांढरपेशी समाजवादी व पर्यावरणवाद्यांच्या अपप्रचाराला बळी पडत आहे. या मंडळींना ‘जीएम’ तंत्रज्ञानाने विकसित केलेली औषधे किंवा परदेशातून आयात केलेला ‘जीएम’ शेतमाल चालताे. पण, ताेच भारतीय शेतकऱ्यांनी देशात उत्पादित केला तर का चालत नाही?

नुकसान भरपाईचे राजकारण

सत्ताधारी मंडळी आर्थिक स्वार्थासाठी कीटकनाशके व बुरशीनाशके उत्पादक कंपन्यांचे हित जाेपासत आहेत. किडी व राेगांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे लाखाे रुपयांचे नुकसान हाेते. विराेधक त्याचे राजकारण करीत नुकसान भरपाईची मागणी करते. एकरी शे-पाचशे रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून सत्ताधरी शेतकऱ्यांविषयीची काेरडी कणव दाखविते. हे चक्र दरवर्षी सुरू असते. मात्र, यावर दीर्घकालीन उपाययाेजना केल्या जात नाही. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी पिके घेताना बियाण्यांची निवड, पेरणी पद्धती, रासायनिक खते, किटकनाशके, पाणी यासह इतर बाबींचे याेग्य नियाेजन करणे गरजेचे आहे. किडींमुळे धाेक्यात आलेली ही अन्नसुरक्षा आज शेतकऱ्यांना तर भविष्यात देशातील प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्याच्या बाबतीत संकटात टाकणारी आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!