‘Montha’ Cyclone : ‘मोंथा’ हिमालयात विरळले तर डिप्रेशन कच्छच्या आखातात विरळणार!
1 min read
‘Montha’ Cyclone : मान्सून (Monsoon) पूर्णपणे परतल्यावरही दोन्हीही समुद्रातील प्रणाल्यांच्या परिणामातून गेल्या 10-12 दिवसांत पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून शेतकऱ्यांची दमछाक केली. बंगाल उपसागरातील ‘मोंथा’ (Montha) चक्रीवादळाचे (Cyclone) अवशेष रविवारी (दि. 2 नोव्हेंबर) ला हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये विरळले. अरबी समुद्रातील डिप्रेशन साेमवारी (दि. 3) गुजरातमधील कच्छच्या आखातात विरळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, मुंबईसह संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यात मात्र अजूनही रविवार व साेमवार म्हणजेच 2 व 3 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, उत्तर अहिल्यानगर जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल. त्यापुढील 3 दिवस म्हणजे गुरुवार (दि. 6 नोव्हेंबर) पर्यंत केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता असून, शुक्रवार (दि. 7 नोव्हेंबर)पासून काही दिवसांकरिता पावसाळी वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवार (दि. 8 नोव्हेंबर)पासून हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता जाणवते. असे असले तरी, लगेचच नाही परंतु नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता अजूनही पुढे नाकारता येत नाही. साेबतच नोव्हेंबर महिन्यात अतिजोरदार थंडीची शक्यताही जाणवत नाही. वातावरणातील बदलानुसार तसे अवगत केले जाईल. आज बंगालच्या उपसागरात ब्रह्मदेश व बांगलादेश किनारपट्टीदरम्यान पुन्हा नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, पुढील 2 दिवसांत त्या किनारपट्टीनेच ते वायव्ये दिशेकडे सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.