Sugarcane growers in Parbhani : परभणीतील ऊस उत्पादकांचे होईल का चांगभले?
1 min read
Sugarcane growers in Parbhani : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील मागील 10 वर्षाच्या साखर कारखानदारीची (Sugar factory) तुलना करता आजची साखर कारखानदारी समाधानकारक टप्प्यावर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नांदेड विभागातील परभणी जिल्ह्यातील साखर कारखानदारीने पुणे व कोल्हापूर विभागातील साखर कारखानदारीचे यश डोळ्यापुढे ठेवून वाटचाल करण्याचे ठरविल्यास परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकऱ्यांचे (Farmers) येणाऱ्या काळात निश्चितच चांगभलं होईल.
सहकारी साखर कारखानदारी पूर्णपणे मागे टाकून जिल्ह्यात आज सात खासगी साखर कारखाने सुरू आहेत. जिल्ह्याच्या दक्षिणेकडील गोदापट्ट्यात सहा साखर कारखान्याचे जाळेच आहे, तर उत्तरेकडे असणारा एकमेव साखर कारखाना जमीन व पाणी उपलब्धता विचारात घेता एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल. वीज व पाणी उपलब्धता, ऊस कारखान्यास देण्यात येणाऱ्या अडचणी असा गतकाळातील संघर्षमय अनुभव असणारा शेतकरी विचारात घेता साखर हंगाम 2023-24 च्या कारखानदारीचा आढावा घेणे गरजेचे आहे.
♻️ गाळप क्षमता आणि प्रत्यक्ष गाळप
जिल्ह्यात सर्वाधिक 6,000 मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असणारा गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड साखर कारखान्याने एकूण 7 लाख 84 हजार 726 मे.टन असा सर्वाधिक ऊस गाळप केला आहे. ट्वेंटी वन शुगर लिमिटेड हा 3,500 मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असणाऱ्या साखर कारखान्याने विक्रमी 7 लाख 55 हजार 709 मे. टन ऊस गाळप केला आहे. बळीराजा शुगर फॅक्टरी लिमिटेड हा 3,500 मे.टन प्रति दिन गाळप क्षमता असणाऱ्या साखर कारखान्याने 6 लाख 12 हजार 663 मे. टन गाळप केले आहे. जिल्ह्यात केवळ गाळप क्षमतेचा निकषावर बळीराजा शुगर फॅक्टरी लिमिटेड प्रथम तर ट्वेंटी वन शुगर लिमिटेड हा साखर कारखाना द्वितीय स्थानावर आहे. योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड या 1,500 मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता असणाऱ्या साखर कारखान्याने 2 लाख 92 हजार 47 मे. टन गाळप केले आहे. श्री रेणुका शुगर लिमिटेड या 1,250 मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता असणाऱ्या साखर कारखान्याने 2 लाख 27 हजार 6 मे. टन गाळप केले आहे. श्री तुळजाभवानी शुगर लिमिटेड या प्रतिदिन 3,500 मे. टन गाळप क्षमता असणाऱ्या नवख्या कारखान्याने 1 लाख 85 हजार 750 मे. टन गाळप केले आहे. जिल्ह्यातील सात कारखान्यांनी मिळून एकूण 33,35,544.67 मे. टन उसाचे गाळप केले आहे. ज्याचा सरासरी साखर उतारा 10.53 असा आहे. एकंदरीत सर्वसाधारण 160 दिवसांचा गाळप हंगाम कालावधीपेक्षा जिल्ह्यातील कारखान्यांचे कमी गाळप दिवस व प्रत्यक्ष अधिक गाळप, ऊस उत्पादकांसाठी आशादायी चित्र निर्माण करत आहे.
♻️ सरासरी ऊस ‘तोड व वाहतूक’ खर्च
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘तोड व वाहतूक खर्च’ माहीत असणे गरजेचे आहे. बेसिक साखर उतारा व कारखान्याचा प्रत्यक्ष साखर उतारा यावर जरी उसाची एफआरपी ठरत असली तरी त्यातून ‘तोड व वाहतूक खर्च’ वजा करून अंतिम एफआरपी निश्चित केल्या जाते. जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिटन सरासरी ‘तोड व वाहतूक’ खर्च गंगाखेड शुगर व एनर्जी लिमिटेड कारखान्याचा आहे, तो प्रति टन 1,001.31 रुपये तर सर्वात कमी 756.13 रुपये योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड चा आहे. श्री रेणुका शुगर लिमिटेड 772.04 रुपये, श्री तुळजाभवानी शुगर लिमिटेड 824.21 रुपये, श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर लिमिटेड 847.23 रुपये, बळीराजा शुगर फॅक्टरी लिमिटेड 848.64 रुपये, ट्वेंटी वन शुगर लिमिटेड 944.63 रुपये असा प्रति टन ‘तोड व वाहतूक’ खर्च आहे.
♻️ साखर उतारा व अंतिम एफआरपी
आदर्श साखर उतारा असणाऱ्या कारखान्यात 11.89 साखर उताऱ्यासह प्रथम स्थानी बळीराजा शुगर फॅक्टरी लिमिटेड तर द्वितीय स्थानी 11.21 साखर उतारा असणारा श्री रेणुका शुगर लिमिटेड हा कारखाना आहे. साखर हंगाम 2023-24 करिता बेसिक साखर उतारा 10.25 टक्के आहे. बेसिक साखर उताऱ्याजवळ उतारा असणारा जिल्ह्यातील ट्वेंटी वन शुगर लिमिटेड व श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर लिमिटेड साखर कारखान्याचा प्रत्यक्ष साखर उतारा अनुक्रमे 10.26 व 10.28 आहे. 10.25 टक्के बेसिक साखर उताऱ्यापेक्षा कमी साखर उतारा असणाऱ्या गंगाखेड शुगर व एनर्जी लिमिटेड कारखान्याचा साखर उतारा 10.10 तर योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड व श्री तुळजाभवानी शुगर लिमिटेड या दोन कारखान्याचा साखर उतारा प्रत्येकी 10.01 असा आहे.
बेसिक साखर उताऱ्यापेक्षा कमी साखर उतारा असताना देय एफआरपी पेक्षा अधिक एफआरपी गंगाखेड शुगर व एनर्जी लिमिटेड आणि योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्यांनी दिली आहे. या दोन कारखान्यांनी प्रति टन 2,700 रुपये एफआरपी दिली आहे. यामध्ये श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचा समावेश असून, या कारखान्याने 2,500 रुपये प्रति टन एफआरपी दिली आहे. बेसिक साखर उताऱ्याजवळ साखर उतारा असणारे ट्वेंटी वन शुगर लिमिटेड व श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर लिमिटेड कारखान्याने तुलनेत देय एफआरपी पेक्षा अधिक एफआरपी दिली आहे, अनुक्रमे प्रति टन 2,700 रुपये व 2550.91 रुपये एफआरपी दिली आहे. बेसिक साखर उताऱ्यापेक्षा प्रत्यक्ष साखर उतारा अधिक असणाऱ्या बळीराजा शुगर फॅक्टरी लिमिटेड व श्री रेणुका शुगर लिमिटेड कारखान्यांनी देय एफआरपी प्रमाणेच अनुक्रमे 2,804.84 रुपये व 2,700 रुपये प्रति टन एफआरपी दिली आहे.
बळीराजा शुगर फॅक्टरी लिमिटेड व श्री रेणुका शुगर लिमिटेड कारखाने अधिक एफआरपी देऊ शकतील व तसे झाल्यास जिल्ह्यातील इतर कारखान्यासाठी एफआरपी दर देण्याबाबत एक सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे अधिक चांगभलं होईल.
♻️ ‘एफआरपी’ आणि ‘तोड व वाहतूक’ देयक
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकूण देय तोड व वाहतूक 297.34 कोटी रुपये तर एकूण एफआरपी देयक 896.18 कोटी रुपये रक्कम पूर्णपणे अदा केली आहे. ऊस उत्पादकांसाठी ही बाब दिलासादायक व आनंददायी ठरणारी आहे. ‘तोड व वाहतूक’ आणि एफआरपी देयकांची तुलना केल्यास 75 टक्के रक्कम एफआरपीसाठी तर 25 टक्के रक्कम ‘तोड व वाहतूक’ पोटी देण्यात आली आहे. या रकमांची तुलना केल्यास तोड व वाहतुकीसाठी अधिक खर्च होत आहे असे निदर्शनास आले, यात कपात केल्यास ऊस उत्पादकांना अधिक एफआरपी देता येईल. त्यासाठी जिल्ह्यातच कारखाना क्षेत्रालगत 80,000 ते 90,000 हेक्टर ऊस क्षेत्र असणे गरजेचे आहे. उसाचे क्षेत्र वाढवण्यासाठी कारखान्यांनी अधिक नियोजन करून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काळात पावले उचलणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात सहवीज निर्मिती, इथेनॉल व अल्कोहोल उत्पादनासह अन्य उपउत्पादने वाढवून जिल्ह्यातील साखर कारखाने अधिक कार्यक्षम होणे गरजेचे आहे. ‘कारखाना कार्यक्षम तर शेतकरी सक्षम’ हे संतुलन साधण्याचे ध्येय जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अंमलात आणावे. प्रति हेक्टर ऊस उत्पादकता व साखर उतारा वाढीसाठी कारखान्यांनी विशेष कृती कार्यक्रम आखावा, त्यासाठी शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, ही काळाची गरज आहे.
♻️ जिल्ह्यातील कार्यक्षम साखर कारखाने
एकूण गाळप क्षमतेपेक्षा अधिक गाळप, बेसिक साखर उताऱ्यापेक्षा अधिक साखर उतारा, तुलनेने ‘तोड व वाहतूक’ खर्च कमी आणि योग्य एफआरपी या निकषावर जिल्ह्यात कार्यक्षम कारखान्यांमध्ये बळीराजा शुगर फॅक्टरी लिमिटेड, ट्वेंटी वन शुगर लिमिटेड, श्री रेणुका शुगर लिमिटेड या कारखान्यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
♻️ सोयाबीन व ऊस उत्पादक शेतकरी
जिल्ह्यात 2 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची कमी कालावधीत शेती करून जिल्ह्याच्या उत्पन्नात 2,000 कोटी रुपयांची भर टाकणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा 500 कोटी रुपये जिल्ह्याच्या उत्पन्नात वाटा असणारा अधिक कालावधी घेणारा ऊस उत्पादक शेतकरी आपल्या हक्काबाबत अधिक जागरूक आहे. त्यांची जागरूकता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यावी व सोयाबीन देखील ऊसाप्रमाणेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे पीक ठरावे. जिल्ह्यातील ऊस उत्पादकांपुढे इत्यंभूत आढावा मांडावा व त्यावर शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक विचार करावा, याच करिता हा लेखन प्रपंच.
माहिती स्त्राेत :- साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.