Temperature increased : महाराष्ट्रात कशामुळे वाढले उष्णतामान?
1 min readपूर्व मोसमी (मार्च ते मे ) हंगामात जेव्हा दोन प्रति-चक्री वादळे अथवा प्रति-विवर्ते (Anticyclone) किंवा उच्च हवेच्या दाबाचे डोंगर एक अरबी समुद्रात तर दुसरे बंगालच्या उपसागरात किंवा किनारपट्टीच्या भू-भागावर तयार होतात, तेव्हा या दोघांच्या मध्ये वाऱ्याची विसंगती (Wind discontinuity) तयार होते. म्हणजेच वारे एकमेकांच्या विरुद्ध महाराष्ट्रात तसेच देशाच्या मध्यावर वाहू लागतात. अरबी समुद्राच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे तर बंगालच्या उपसागराच्या बाजूला दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. या दोघांमध्ये जी निर्वात पोकळी तयार होते तिलाच ‘वारा खंडितता’ (Wind discontinuity) म्हणतात.
सिझननुसार घडणाऱ्या प्रणल्यांनुसारच देशात पूर्व-मोसमी (मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने ) या सिझनमधील ‘वारा खंडितता’ ही प्रणाली सुद्धा ठळक वैशिष्ठ्याची असते. या प्रणालीमुळे देशात 15 ते 20 डिग्री अक्षवृत्त दरम्यान उच्च दाब क्षेत्रे तयार होतात. काही कालावधीनंतर ते विरळही होत असतात.
आज ही वारा खंडितता प्रणालीमुळे समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा आस हा दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत पसरला असून याची रुंदीही काही किलोमीटरमध्ये आहे. त्यामुळे तेथे वारा शांत असतो. हवेच्या दाबाच्या रेषाचे व वारा दिशांचे जोड क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामुळे या क्षेत्रात आर्द्रतायुक्त उष्ण हवा लोटली आहे. सौराष्ट्र व कच्छ, उत्तर कर्नाटकात तसेच नैऋत्य राजस्थानात उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती जाणवत आहे. म्हणून या पाच दिवसात महाराष्ट्रात अति नसली तरी उष्णता वाढलेली (Temperature increased) आहे.