krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farm and farmer : शेतकऱ्याच्या पोरांनो! केसावर फुगे विका, पण शेती नका करू!!

1 min read
Farm and farmer : संपूर्ण विश्वातील पहिला व्यवसाय जर कुठला असेल तर तो म्हणजे शेती (Farm)! जल, जंगल, शेती या तीन गोष्टी त्या काळातील माणसाच्या जगण्याचे साधन होते. या आधारावर मनुष्य जीवन विकसित झाले आहे. सुरुवातीची नैसर्गिक शेती त्याच्यानंतर पारंपारिक शेती आणि आत्ताची आधुनिक शेती असे स्थित्यंतरे शेती व्यवसायामध्ये आले. समस्त सजीवांसाठी जगण्याचं साधन म्हणजे शेती. त्या काळातही आणि आजही शेती कसणारा शेतकरी (Farmer) हा खऱ्या अर्थाने या सृष्टीवरील सजीवांचा अन्नदाता आहे. मात्र आज रोजी या अन्नदात्यालाच आत्महत्या करावी लागत असेल तर, ती शेती करण्यात काय अर्थ आहे?

या देशात रोज 43 शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) करतात. त्याला अनेक असे कारणे आहेत. पारंपारिक शेती आधुनिक शेतीत रुपांतरित होताना शेतीमध्ये जे अमुलाग्र बदल झाले, ते बदल व शेतीविरोधी असलेले काळे कायदे, ध्येयधोरण, या सगळ्या गोष्टी शेतीच्या पचणी पडल्या नाहीत. नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले. काही तंत्रज्ञानाच्या वापरावर सरकारने बंदी घातली. तेच तंत्रज्ञान पुढे शेतकऱ्यांच्या बोकांडी बसले. सरकारच्या शेतीमाल बाजारातील हस्तक्षेपामुळे उत्पादनखर्चाच्या पटीत निव्वळ नफा उरला नाही. शेती तोट्यात गेली. पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी झाला. या कर्जबाजारी शेतकऱ्याला शासनाने वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून सावरण्याचा प्रयत्नही केला. मात्र ही सगळी प्रणाली सदोष व भ्रष्टाचारी असल्याने शेतकऱ्यापर्यंत याचा थेट लाभ मिळाला नाही. म्हणून सरकारी योजनांनी शेतकरी सावरला गेला नाही.

सरकारच्या चुकीच्या धाेरणांमुळे देशात महागाईचा राक्षस चालून आला. त्यामध्ये कित्येक उद्योग नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर होते, तेव्हा सरकारातील लोकांनी व्यवस्थेतील लोकांनी वेळोवेळी योग्य अर्थसहाय्य करून ते उद्योग वाचवण्याचा प्रयत्न केला. या उद्योगातील कर्ज बुडव्यांना अर्थसहाय्य करून सरकारने उद्योगपतींना मदत केली. मात्र, देशाच्या सकल उत्पन्नामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या शेतीला दुय्यम स्थान दिले. शेतीवर अप्रत्यक्षरीत्या वेगवेगळे कर लादले. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा महाग केल्या आणि येणाऱ्या उत्पन्नाला कमीत कमी भाव देऊन शेतकरी आणि शेती नसतानाबूत केली. व्यापार, उद्योग, शहरांचा विकास, तीर्थक्षेत्र, पर्यटन, रस्ते या अशा ठिकाणी भ्रष्टाचार करून पैसे खायला मिळतील म्हणून भरमसाठ निधी खर्च केला. शेतीसाठी लागणारे पाणी, वीज, बीज, रासायनिक खतं, वेळेवर पतपुरवठा अस्मानी, सुलतानी संकटात मदत या सगळ्या गोष्टी शेतीला मिळाल्या नाही.

एक कोटी रुपयांची जमीन असणारा शेतकरी तीन लाख रुपये उत्पन्न काढतो आणि एक लाख रुपये व्यवसायात गुंतवणारा व्यवसायिक वर्षाला तितकेच पैसे कमवून सुखाने जीवन जगतो. हा विरोधाभास पाहून शेतकऱ्यांच्या तरुण पोरांमध्ये एक वेगळा विचार रुजत आहे, तो म्हणजे शेती न करण्याचा! मित्रहो, मी एक शेतीनिष्ठ किसानपुत्र आहे. शेती मातीवर माझा प्रचंड विश्वास आहे. पण, आजची परिस्थिती पाहता असं लक्षात येते, हजार आडथळे पार करून कष्ट करून शेतकऱ्यांनी काढलेले उत्पन्न हे सरकार आपला नीचपणा दाखवून माती मोल भावानं खरेदी करत आहे. उद्याेगपती व व्यापाऱ्यांच्या अधीन असलेले हे सत्तेतील लोक शेतकऱ्यांच्या मानगटीवर बसलेले आहेत. या मस्तवाल बैलांना वठणीवर आणण्यासाठी समस्त शेतकऱ्यांच्या पोरांना विनंती करतो की, आपणही छोटासा व्यवसाय थाटावा, समोर येईल ते काम करावं. मात्र, येणारी पुढची पिढी शेतीमध्ये येऊ देऊ नका, अर्थातच केसावर फुगे विका मात्र शेती करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!