krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

शेतीतील किटकांचे योगदान

1 min read
Agricultural insects : माणसाला निसर्ग आणि शेती समजण्याच्या कितीतरी आधीपासून किंबहुना; पृथ्वीवर माणूस येण्याच्या किती तरी आधीपासून कीटक या पृथ्वीवर शेती करत आले आहेत. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या (Evolution) टप्प्यांमधून पृथ्वीवरील जीवजंतू आणि वृक्षसंपदा यांच्यामध्ये अतूट असे बंध जुळत गेले आणि यातून जीवसृष्टी अधिक समृद्ध होत गेली. पृथ्वीवर आतापर्यंत जवळपास 80 टक्के किटकांचा (Insects) अभ्यास झाला आहे. ज्यात जवळपास 9,00,000 इतक्या किटकांच्या प्रजाती आहेत, असे समोर आले आहे. वरती दिलेला आकडा कदाचित चुकीचा असू शकतो. इतक्या प्रचंड प्रमाणात पृथ्वीवर कीटक आहेत. जवळपास 80 टक्के वनस्पती आणि वृक्षांचे परागीकरण (Pollination) किटकांमुळेच होत असते.

🌳 वड, पिंपळ व औदुंबर
काही झाडं तर अशी आहेत की, ज्यांच्या फुलाच परागीभवन (Pollination) त्यांना हवा असलेला विशिष्ट कीटकच करेल, याची ते वृक्ष काळजी घेत आले आहेत. याची उदाहरणे कितीतरी निसर्गात विखुरलेली आहेत. पण, याच सर्वोत्तम उदाहरण द्यायचे झाले तर वड, पिंपळ, औदुंबर इत्यादी वृक्षांचे देता येईल. जेवढ्या जातींचे औदुंबर तेवढ्याच विविध जातींचे असतात ‘वास्प’ छोट्याश्या ‘केमु’सारखे दिसणारे हे कीटक. त्याचं जीवन एखाद्या वडाच्या किंवा औदुंबर फळामध्ये सुरू करतात आणि त्याचा शेवट ही याच फळामध्ये होतो. या सगळ्यांची सुरुवात होते वडाला किंवा औदुंबरला फुले येण्यापासून. होय फुले, आपण ज्याला औदुंबर किंवा वडाचे फळ (Fruit) समजतो, प्रत्यक्षात ते फळ नसते. ते असते हजारो कळ्यांनी भरलेलं एक फुल (Flower). ज्याला डोक्यावर एक छोटेसे छिद्र असते. विशिष्ट जातीच्या वड, उंबर प्रजातींमध्ये त्या प्रजातीच्या वृक्षाला हवे असलेल्या किटकालाच आत येता यावे, एवढेच छिद्र या फुलांना असतें. वास्प किटकाची मादी या छिद्रातून आत प्रवेश करताना तिला असलेले पंख आणि डोक्यावर असलेले स्पर्षक (Antene) गमावते. मग तिचा अंधाऱ्या फुलांच्या बागेत प्रवेश होतो. इथे तिच्या अवतीभोवती खूप साऱ्या कळ्या असतात. आत येताना तिने आणलेले पराग कण (Pollen particles) ती या कळ्यांना देते. तसे केल्यानंतर या कळ्यांचे फुलामध्ये रुपांतर होते. या अंधार्‍या फुलांच्या बागेमध्ये मग वास्प कीटकाची मादी (Female) अंडी (Eggs) घालते आणि तिथेच दम तोडते. यानंतर सृष्टीचं दुसरं चक्र या अंधाऱ्या बागेत सुरू होतं, ते म्हणजे सृजनाच. मादीने घातलेली अंडी मोठी होतात. त्यातून सर्वप्रथम नर बाहेर येतात. नाराना (Male) पंख नसतात. त्यांच्या नंतर पंखवाल्या माद्यांचा (Female) जन्म होतो आणि दोघांचे या अंधाऱ्या बागेतच मिलन होते. मिलनानंतर नर माद्याना फुलांच्या अंधाऱ्या बागेतून मुक्त करण्यासाठी धडपड करत आतून सुरुंग खोदत मग औदुंबराच्या फळाला (असंख्य फुलांभोवती असलेल्या आवरणाला आपण एकत्रितरित्या फळ म्हणतो.) छिद्र पडतात आणि त्यातच सारे नर मरून जातात. पण त्यांच्या साऱ्या माद्या फुलांच्या कैदेतून आझाद होतात. या कैदेतून बाहेर पडत असताना त्या फुलांमध्ये असलेले परागकण घेऊन बाहेर पडतात. लवकरच त्या मरणार असतात. पण, मारण्याआधी त्यांना पुन्हा नवीन चक्र सुरू करायचं असते आणि त्यासाठी त्या नवीन झाडाच्या शोधात असतात. मग परागीभवनासाठी तयार असलेल्या फळामधून माफ करा, फुलांच्या बागेतून सुटलेल्या गंध पुन्हा त्यांना कैदेत जाण्यास प्रवृत्त करतो आणि सृष्टीचं दुसरं चक्र सुरू होते.

🦋 मधमाशा व फुलपाखरे
अशाच प्रकारे कितीतरी फुलांचे देखील असते. आपल्याला हव्या असलेल्या कीटकालाच आपल्यापर्यंत पोहोचता यावे म्हणून झाडे आपआपल्या फुलांचे रंग हव्या असलेल्या कीटकालाच ते फुल दिसेल याप्रमाणे ठेवत आली आहेत. उदा, लाल रंगाची फुलं मधमाश्यांना (Honey Bee) दिसत नाहीत आणि तीच फुलं फुलपाखरांना (Butterfly) बरोबर दिसतात. याची सोय झाडं करत आली आहेत. त्याचबरोबर फुलांचा आकार देखील त्याप्रमाणे झाडे निवडतात, ज्यामुळे त्या जातीच्या फुलात दडलेला मकरंद विशिष्ट कीटकालाच टिपता येतो. काही फुले फुलपाखराची असतात तर काही रात्री फिरणाऱ्या पतंगांची (Moth) असतात. फुलपाखराची सोंड (Probosis) ही पतंगांच्या सोंडीपेक्षा लहान असते. त्यामुळे ज्या फुलांना पतंग परागीभवीत करतात. त्या फुलांच्या परागापर्यंत फुलपाखरांना पोहोचता येतं नाही आणि अशी फुलं बहुदा रात्रीच्या (Night)
वेळेला किंवा संध्याकाळी (Evening) फुलणारी असतात. कारण यावेळेत सकाळी (Morning) झोपी गेलेला पतंग जागा होऊन भुकेसाठी फिरत असतो आणि यावेळी फुलपाखरे झाडांच्या पानाखाली झोपी गेली असतात.

🐞 नकोशा असलेल्या माशा, भुंगे महत्त्वाचे
आपल्याला घरात अतिशय नकोशी झालेली माशी (House fly) देखील परागीभवनाचे सर्वात महत्त्वाचं काम करत असते. तिच्या बरोबर गांधील माशी (Paper wasp) मोठी मधमाशी (Bumble bee) इत्यादी अनावश्यक वाटणाऱ्या माश्या देखील परागीभवन करण्यात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात. शेतातून बऱ्याचदा सुकलेल्या खोडामध्ये मातीच घरटे असलेल्या माश्या राहत असतात. अशी लाकडे आपण सरपण म्हणून जाळून टाकतो. त्याचप्रमाणे जमिनीत शेणावर, आणि झाडांच्या अवतीभवती फिरणारे भुंगे आपल्याला नकोशे वाटत असतात. पण, वांगी, टॉमेटो, भोपळे, मिरची इत्यादी पिकांचे परागीभवन करण्यासाठी भुंगे (Beetles) खूप आवश्यक असतात. ते जेव्हा फुलाभोवती येऊन गुणगुण करतात, तेव्हा त्यांचं गाणं ऐकूनच फुल परागीभवन करण्यास तयार होतं. अशा प्रकारच्या परागीभवन प्रक्रियेला ‘बझ्झ पोलिनेशन’ (Buzz pollination) म्हणतात.

🦗 किटकांची मेहनत
हा झाला कीटकांचा परागीभवनाचा भाग. कीटक शेतीमध्ये शेकडो मजुरांपेक्षा जास्त राबतात. पण बदल्यात आजवर आपण त्यांना काय दिलं? ज्याप्रमाणे शेतात मजुराने दिवसभर मेहनत केल्यानंतर आपण त्यांना पगार देतो. त्याप्रमाणे कीटक आपल्याकडे पगार मागत नाहीत. पण त्याच्या मेहनतीचा हिस्सा ते खाऊ पाहतात. पण बिचारे दुर्दैवी कीटक आपण त्यांना तेही खाऊ देत नाहीत. आपण कीटक आले की, सरळ कीटकनाशके फवारून त्यांना जिवानिशी ठार करतो. त्यांना जन्म घेण्यासाठी, राहण्यासाठी आवश्यक असणारी बांधावरची झाडझुडपं आपण कचरा समजून पेटवून देतो किंवा उपटून टाकतो.

किटकांची अडचण
कीटक जास्त दूर जात नाहीत. त्यामुळे जंगल किंवा किव्वा डोंगर दऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतात त्यांना सहज ये जा करता येते. पण जिथे आजूबाजूला झाडंझुडपं नाहीत आणि दूरवर शहर पसरलेले आहे, अशा ठिकाणी असलेल्या शेतापर्यंत त्यांना पोहोचता येत नाही. रात्री लोकवस्तीमध्ये लावलेल्या विजेच्या दिव्यांच्या रोषणाई भोवती आकर्षित होऊन कीटक संमोहित होतात आणि दिव्याभोवती फिरून फिरून दमून मरून जातात. इथे त्यांची वाट बघत असलेली फुलं फुलतात आणि सुकून जातात, पण त्यांचं फळ होत नाही!

2 thoughts on “शेतीतील किटकांचे योगदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!