krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rabbi Sorghum Water Management : एक कोळपणी आणि अर्धे पाणी

1 min read
Rabbi Sorghum Water Management : कोरडवाहू शेतीत (Dryland farming) 'ओल तसे मोल' या उक्तीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. एकूण पडणाऱ्या पावसापैकी (Rain) 10 ते 20 टक्के पाणी (Water) जमिनीवरून वाहून जाते. बाकीच्या पाण्यापैकी 10 टक्के पाणी निचऱ्याद्वारे (Drain) व 60 ते 70 टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे (Evaporation) निघून जाते. जमिनीत त्यामुळे सुमारे 10 टक्के पाणी उपलब्ध राहते. वाहून जाणारे पाणी, निचऱ्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात कसे साठविता येईल आणि त्या ओल्याव्याचा उपयोग पीक उत्पादन वाढीसाठी कसा करता येईल, हा कोरडवाहू शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर येथे त्या दृष्टीने सखोल अभ्यास करण्यात आला आणि काही महत्त्वाच्या तंत्राचा शेतीमध्ये अवलंब करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बांधबंदिस्ती, आंतरबांध व्यवस्थापन, उतारास आडवी मशागत करणे, कोळपणी करणे, आच्छादनाचा वापर, शेततळी, वनस्पतींचा बांधासारखा वापर ही महत्त्वाची तंत्र आहेत.

जमिनीत ओल टिकवून ठेवण्याच्या उपायाआधी जमिनीतील ओल कशी कमी होते, हे पहावे. जमिनीत साठवून राहिलेली ओल पिकांनी वापरणे, पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाणे, भेगा पडल्यामुळे त्यातून बाष्पीभवन होणे, तणावाटे ओल नष्ट होणे या चार मार्गाने जमिनीतील ओल कमी होते. त्यातील पिकांच्या प्रत्यक्ष वाढीसाठी अतिशय कमी प्रमाणात ओल लागते. बहुतांशी (सुमारे 60 टक्के) ओल ही बाष्पीभवनामुळे उडून जाते. वर उल्लेख केलेल्या मार्गाने कमी होणाऱ्या ओलीचा बंदोबस्त त्यावर केलेल्या उपायाने होतो.

🔆 एक कोळपणी आणि अर्धे पाणी
❇️ पीक वाढताना त्याबरोबर तण वाढत असते. हे तण (weed) पाणी (Water), अन्नद्रव्ये (Nutrients) आणि सूर्यप्रकाश (Sunlight) याबाबतीत पिकांशी स्पर्धा करते. पीक उगवून आल्यावर त्यात ठराविक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे होय. तणामुळे कमी होणारी ओल, तणांचा बंदोबस्त केल्याने कायम राखली जाते. याशिवाय माती हलवून ढिली केल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो. त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. यामुळे ओल टिकवून धरण्यामध्ये कोळपणीचा फार मोठा वाटा आहे.

❇️ रब्बी हंगामात तर कोळपणीचा फार मोठा सहभाग आहे. ग्रामीण भागात ‘एक कोळपणी आणि अर्धे पाणी’ अशी म्हण आहे. म्हणजे एकदा कोळपणी केली तर जवळ जवळ पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. या तत्वांचा अवलंब करून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारी (Rabbi sorghum) करता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.

✳️ पहिली कोळपणी पीक तीन आठवड्यांचे झाले असता फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळ वाढणारे तण नष्ट करून त्या वाटे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.
✳️ दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्यांचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी. त्यावेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडू लागलेल्या असतात. त्या कोळपणीमुळे बंद होतात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते. हा मातीचा हलका थर जो तयार होतो, त्याला इंग्रजीमध्ये डस्ट मल्च (Dust Mulch) असे म्हणतात.
✳️ तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्यांचे झाले असता करावी. त्यावेळी कोळपणी करण्यासाठी दातेरी कोळपे वापरण्याची शिफारस केली आहे. जमीन टणक झाल्याने फासाचे कोळपे नीट चालत नाही. त्याकरीता दातेरी कोळपे वापराले असता, ते मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि त्यामुळे भेगा बुजविल्या जातात. जमिनीत ओल फार कमी असेल, त्यावेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.

🔆 रब्बी ज्वारीस द्या तीन कोळपण्या
✳️ पहिली कोळपणी – तिसऱ्या आठवड्यात – फटीच्या कोळप्याने
✳️ दुसरी कोळपणी – पाचव्या आठवड्यात – पासेच्या कोळप्याने
✳️ तिसरी कोळपणी – आठव्या आठवड्यात – दातेरी कोळप्याने

✳️ कोरडवाहू रब्बी ज्वारी तयार होण्यास जमिनीत साधारणपणे 180 पासून 280 मि.मी. ओल लागते. त्यापैकी 40 टक्के ओल पीक फुलोऱ्यात येण्यापासून तयार होण्याच्या अवस्थेत लागते. म्हणून प्रयत्नपूर्वक ओल साठविण्याचे उपाय करावे लागतात.
✳️ आंतरमशागती करीता खुरपणी देखील अपेक्षित आहे. परंतु, सुरुवातीस ज्यावेळी जमीन मऊ आहे आणि तण वाढत आहे, त्यावेळी या खुरपणीचा लाभ होतो. परंतु, बैल कोळपे चालविण्याने खोलवर मशागत करता येते आणि जमीन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो. आंतरमशागतीचे म्हणजे पीक उगवून आले असता, त्याच्या दोन ओळीत केलेली मशागत. त्यात काही प्रमाणात विरळणी देखील करता येईल. मर्यादेपेक्षा ज्यादा असलेली रोपे काढून टाकणे आणि हा पण एक ओलावा टिकविण्याचा उपाय आहे.

🔆 रब्बी ज्वारीस पाणी व्यवस्थापन (Water Management)
✳️ ज्वारी हे कोरडवाहू पीक म्हणून ओळखले जाते. या पिकास तयार होण्यासाठी 110 ते 120 दिवसांचा काळ लागत असल्याने मोठ्या प्रमाणात धान्य व कडब्याचे उत्पादन घेण्यासाठी या पिकाला पाण्याची गरज असते.
✳️ बागायती ज्वारीस दिलेल्या पाण्यापैकी 70 टक्के पाणी पहिल्या 30 से.मी. जमिनीच्या थरातून, 16 टक्के पाणी दुसऱ्या थरातून, 9 टक्के पाणी तिसऱ्या थरातून तर उरलेले 5 टक्के पाणी चाैथ्या थरातून पीक घेत असते. पहिल्या 30 से.मी. थरात 60 टक्क्यांपेक्षा जास्त मुळे असल्याने या थरातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भागवली जाते.
✳️ बागायती रब्बी ज्वारीस पीक वाढीच्या महत्त्वाच्या चार अवस्थेत पाणी देणे फायदेशीर ठरते. मात्र, भारी व काळ्या खोल जमिनीत पहिल्या तीन अवस्थेतच पाणी द्यावे.

🔆 रब्बी ज्वारीस पाणी देण्याच्या अवस्था
✳️ ज्वारी पिकाचा जोमदार वाढीचा काळ :- पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी.
✳️ पीक पोटरीत असताना :- पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनी.
✳️ पीक फुलोऱ्यात असताना :- पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी.
✳️ कणसात दाणे भरण्याचा काळ :- पेरणीनंतर 90 ते 95 दिवसांनी.
✳️ कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना 50 ते 55 दिवसांनी पाणी द्यावे.
✳️ दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीच्या पिकाला पाणी द्यावे.
✳️ बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर 70 ते 75 दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना 90 ते 95 दिवसांनी पाणी द्यावे.
✳️ भारी जमिनीत ज्वारीच्या पिकाला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!