krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Summer : मुंबईकरांना उन्हाचा ताप एवढा का?

1 min read
Summer : उन्हाळ्यात (summer) मुंबई आणि परिसरात उन्हाचा ताप अधिक जाणवत असल्याचे मुंबईकर सातत्याने सांगत आहेत. खारघर येथे उष्माघाताची घटनाही घडली. मुंबई शहर आणि उपनगरे बेटांचा भाग आहेत. याचा काही भाग समुद्र सपाटीच्या स्तरावर तर, काही भाग त्याखालीही आहे. बांगलादेशाच्या काही भागानंतर मुंबईचाच काही भाग समुद्र सपाटी आणि त्याही खाली जाणवतो. मुंबई आणि उपनगरांच्या पूर्व व दक्षिण दिशेला सह्याद्री उभा ठाकला आहे. उत्तर व पश्चिम दिशेला मात्र विशेष अटकाव नाही. ही भौगोलिक स्थिती प्रथम लक्षात घ्यायला हवी.

💥 खाऱ्या वाऱ्याची बदलती दिशा
मार्च ते मे हा तीन महिन्यांचा मान्सूनपूर्व हंगाम महाराष्ट्रासाठी भौगोलिक रचनेनुसार वातावरणात एकाएकी खूप बदल घडवून आणतो. कोकण किनारपट्टीला समुद्राचा खारा वारा (Salty wind) दररोज आदळतो. दिवसा आणि रात्री वाऱ्याची दिशा वेगळी असते. या दरम्यान पाकिस्तान, अफगाणिस्तान व राजस्थानच्या भागातून उच्च दाबाची प्रणाली निर्माण झाली तर, वायव्य दिशेकडून म्हणजे गुजरात आणि अरबी समुद्रावरून येणारे वारे उष्णता व आर्द्रता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर अडकून आदळतात. उष्णतेची लाट मुंबईसह कोकणात महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा जास्त जाणवते. ही उष्णतेची लाट यंदाच्या हंगामात आधीच्या वर्षांपेक्षा वेगळी आहे, असे म्हणता येणार नाही. या व्यतिरिक्त हंगामातील वारा खंडितता प्रणालीमुळे या वर्षी मुंबई उष्णतेने तापलेली जाणवत आहे.

💥 वारा खंडितता
पूर्व मोसमी (मार्च ते मे) हंगामात दोन प्रतिचक्रीवादळे अथवा प्रतिविवर्ते (Anticyclone) किंवा उच्च हवेच्या दाबाचे डोंगर (अवाढव्य प्रणाली) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात किंवा किनारपट्टीच्या भूभागावर तयार होतात, तेव्हा या दोघांमध्ये वाऱ्याची विसंगती (Wind discontinuity) तयार होते. महाराष्ट्रात आणि देशाच्या मध्यावर वारे एकमेकांच्या विरुद्ध वाहू लागतात. अरबी समुद्राच्या बाजूला, उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. या दोघांमध्ये निर्माण होणाऱ्या निर्वात पोकळीला वारा खंडितता म्हणतात. विविध हंगामांमध्ये घडणाऱ्या प्रणालींनुसारच देशात पूर्वमोसमी (मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने) हंगामामधील वारा खंडितता (Wind discontinuity) ही प्रणाली वैशिष्ट्यपूर्ण असते. या प्रणालीमुळे देशात 15 ते 20 अंश अक्षवृत्तादरम्यान उच्च दाबाची क्षेत्रे तयार होतात. हे क्षेत्र काही कालावधीनंतर विरळही होते. या वर्षी मात्र पूर्व मोसमी हंगामातील वारा खंडितता या प्रणालीचा कालावधी अधिक (50 दिवस) टिकून राहिला आणि तो अजूनही आहे. पूर्व मोसमी (मार्च ते मे) हंगामात वातावरण, विशेषतः वारा खंडितता प्रणाली सर्वसाधारणपणे जशी असायला हवी, तशी ती आठ मार्चपासून नाही.

💥 हवेच्या निर्वात दाबाचा आस
सर्वसधारणपणे देशाच्या पूर्व किनारपट्टीला समांतर भूभागावर, झारखंड ते दक्षिण चेन्नईपर्यंत समुद्रसपाटीपासून एक ते दीड किलोमीटर उंचीवर हवेच्या निर्वात दाबाचा आस (Trough) असतो. हा आस या वर्षी सरासरी जागेपेक्षा वायव्येकडे (उत्तर महाराष्ट्र ते तमिळनाडूपर्यंत) दोलायनात झुकल्यामुळे, महाराष्ट्रात अवकाळीचा परिणाम अधिक जाणवला. हा परिणाम अजूनही कायम आहे. वारा खंडितता या प्रणालीचा प्रभाव अजूनही टिकून असल्यामुळे 27 एप्रिल 2023 रोजी हवेच्या निर्वात दाबाचा आस समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीपर्यंत तसेच पश्चिम विदर्भातील बुलढाण्यापासून (मराठवाड्यातून जाऊन) उत्तर तमिळनाडूतील वेल्लोरपर्यंत पसरला आहे. त्यामुळेच विदर्भासहीत मध्य भारतात अवकाळी वातावरणाचा परिणाम जाणवत आहे. हे अवकाळी वातावरणासंबंधी असले तरी याच प्रणालीमुळे कोकणपट्टी व अरबी समुद्रात हवेची उच्च दाब क्षेत्रे टिकून राहतात. यावर्षी अधिक कालावधीपर्यंत ही क्षेत्रे टिकून राहिली.

💥 मुंबईकरांना उष्णता का जाणवते?
वातावरणाच्या या अवस्थेमुळे मुंबई व उपनगरात हवेचे उच्च दाबाचे क्षेत्र, महाकाय हवेच्या फुग्यासारखे कित्येक हजार चौरस किलोमीटर अबाधित राहिले. त्याला आपण हवेचे महाकाय ‘पार्सल’ (parcel) म्हणू या. नेहमीच्या प्रक्रियेनुसार रात्री जमिनीकडून अवकाशात होणारी उष्णतेची दीर्घ लहरी (Prolonged heat wave) उत्सर्जनेदेखील या उच्च दाबामुळे कमी प्रमाणात घडत होती. त्यामुळे उष्णता कोंडून राहिली. मुंबई हे अरबी समुद्राच्या किनारपट्टीचे ठिकाण असल्यामुळे रोजच्या खारे व मतलई वाऱ्याचा परिणामही या हवेच्या ‘पार्सल’वर विशेष झाला नाही. समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटरपर्यंत हवेच्या उच्च दाब क्षेत्रात उष्णता साठवून ठेवली गेली. मुंबईच्या पूर्व व दक्षिणेकडील स्थित सह्याद्रीमुळे या हवेच्या उच्च दाब प्रणालीत वारा प्रवेश करण्यामध्ये अडचण निर्माण होते. हे हवेचे ‘पार्सल’ उच्च दाबामुळे फुटत नाही. त्यामुळेच मुंबई परिसरातील हवेचे वहन न झाल्यामुळे उष्णता हवेत साठते. या साठलेल्या अबाधित उष्णतेचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. यासोबत मुंबई दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असून, उच्च दाब क्षेत्र कालावधीत धूर, धुलिकण वातावरणातून बाहेर पडायला विलंब लागतो. अवकाशातही त्याचे उर्ध्वगमन होऊन उत्सर्जन होत नाही. आधीच वारा खंडितता प्रणालीतून वाढलेल्या उष्णतेत, मानवनिर्मित उष्णतेची भर पडते. मार्च व एप्रिल महिन्यात मुंबईकरांना जाणवणाऱ्या उष्णतेचे हेच मुख्य कारण वाटते. सर्वसाधारणपणे अशी अवस्था अनुभवल्यानंतर काही तज्ज्ञ त्याचा संबंध जागतिक कारणाशी व चर्चेत असलेल्या जागतिक तापमानवाढीशी लावतात. सध्या तरी या गोष्टीला ठोस दुजोरा मिळालेला नाही.

💥 किरकाेळ पावसाची हजेरी
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात वातावरण कसे वळण घेते, त्यावर या गोष्टी अवलंबून असतात. पूर्व मोसमी हंगामातील समान तापमान दाखवणाऱ्या रेषा (Isotherm) बघितल्यास, मुंबईचे सरासरी तापमान हे गुजरात व केरळपर्यंत पसरलेल्या किनारपट्टीवरील तापमानासमान आहे. गुजरात व किनारपट्टीचे तापमान समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असलेल्या भूभागाचे आहे. येथे हवेचा दाब मुंबईपेक्षा कमी असतो. पर्यायाने तेथील उष्णता मुंबईपेक्षा तुलनेत कमी असते. कधी कधी वारा खंडितता प्रणालीमुळे मुंबईत थोडाफार पाऊसही (rain) होतो. नैऋत्य राजस्थान व गुजरात राज्यातील समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटरच्या हवेच्या जाडीत वाहणाऱ्या चक्रीय वाऱ्याच्या अतिबाहेरील परीघ क्षेत्रातून तसेच दुपारी चार ते मध्यरात्रीपर्यंत वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्याच्या (salty wind) संयोगातून अरबी समुद्रातून लोटलेल्या आर्द्रतेच्या उर्ध्वगमनातून तेथील स्थानीय क्षेत्रावर मुंबई शहर परिसरात तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस हजेरी लावतो. सध्या कोकणात पावसाळी वातावरणाचा जोर नसला तरी कधी कधी अशा वातावरणीय प्रणालीतून किरकोळ पाऊसही पडून जातो. मुंबईच्या उष्ण वातावरणाला यामुळे थोडासा थंडावा मिळून दिलासाही मिळत असतो. यावर्षी वारा खंडितता प्रणालीमुळे हा दिलासाही हिरावून घेतला गेला.

💥 सरासरी तापमान
या प्रणालीत बदल होतो किंवा पूर्णपणे विरळ अथवा नामशेष होते, तेव्हाच मुंबईत हवेचे वहन होऊन उन्हाळ्यात वातावरण आल्हाददायक होते. यावर्षी उन्हाळ्यासाठी मुंबई व उपनगराबरोबर ठाणे, रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यताही 55 टक्के जाणवते. म्हणजेच, या भागात उन्हाळा कडक असण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे 45 टक्के जाणवते. याचा अर्थ मुंबईतील भूभागावर पहाटेचा गारवा कमीच जाणवेल. हे परिणाम आपण मार्च महिन्यापासून बघत आहोत. या पूर्वानुमानानुसार, यंदा मुंबई उष्णतेच्या अधिक लाटा येतील, असे जाणवत नाही. वारा खंडितता प्रणाली अधिक कालावधीपर्यंत टिकून राहिल्यामुळेच सध्याची परिस्थिती जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!