Sugar Production : साखरेच्या उत्पादनात 17.7 लाख टनांची घट
1 min read
मागील हंगामात या वेळेपर्यंत देशभरातील 305 साखर कारखान्यांनी साखरेचे गाळप केले हाेते. चालू हंगामात केवळ 132 कारखान्यांनी साखरेचे गाळप केले. महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी गाळप बंद केले असून, गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत 153 कारखान्यांचे गाळप सुरू होते. महाराष्ट्रात साखरेच्या उत्पादनात 21.5 लाख टनांची मोठी घट झाली आहे. चालू हंगामात देशभरात 15 एप्रिल 2023 पर्यंत राज्यात 328.7 लाख टन साखरेचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना वास्तवात उत्पादन 311 लाख टनांवर स्थिरावले आहे.
देशातील साखर उत्पादनाम महाराष्ट्र हे क्रमांक एक तर कर्नाटक क्रमांक तीनचे राज्य आहे. यावर्षी या दाेन्ही राज्यांमध्ये साखर उत्पादनात माेठी घट आली आहे.
महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी साखरेचे उत्पादन 21.5 लाख टन तर कर्नाटकात 27 लाख टनांनी घटले आहे. त्यामुळे एकूण देशभरातील साखरेचे एकूण उत्पादन घटले आहे. साखर उत्पादनात उत्तर प्रदेश क्रमांक दाेनचे राज्य आहे. चालू हंगामात उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये साखरेचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढले आहे.
ISMA च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 15 एप्रिल 2022 पर्यंत महाराष्ट्रात साखरेचे एकूण उत्पादन 126.5 लाख टन झाले हाेते. ते यावर्षी 21.5 लाख टनांनी कमी झाले. त्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी 105 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कर्नाटकात गेल्या वर्षीच्या 58 लाख टन तर यावर्षी 55.3 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. त्यामुळे कर्नाटकात साखरेचे उत्पादन 2.7 लाख टनांनी घटले. उत्तर प्रदेशात मागील हंगामात 94.4 लाख टन तर या हंगामात 96.6 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. म्हणजेच उत्तर प्रदेशात यावर्षी साखरेचे उत्पादन 2.2 लाख टनांनी वाढले आहे. गेल्या वर्षी या वेळेपर्यंत येथे केवळ 68 तर यावर्षी 77 कारखान्यांनी साखरेचे गाळप केले.
तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, उत्तराखंड आणि ओडिशा या राज्यांचे मागील हंगामात 49.8 लाख टन तर यावर्षी 54.1 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. समीक्षाधीन कालावधीत या राज्यांमध्ये 53 कारखान्यांनी साखरेचे गाळप केले. मागील हंगामात 78 कारखान्यांनी गाळप केले हाेते. चालू हंगामात देशभरात 532 कारखान्यांनी साखरेचे गाळप केले असून, यातील 400 कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. गेल्या हंगामात 518 कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. त्यापैकी 15 एप्रिल 2022 पर्यंत 213 गिरण्यांनी गाळप थांबवले होते.
या वेळी महाराष्ट्रात उसाचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले होते. त्यामुळे उत्पादन कमी होण्याची अपेक्षा होती. हे पाहता सरकारने 61 लाख टन निर्यातीचा कोटा निश्चित केला होता. हा कोटा जानेवारी 2023 मध्येच पूर्ण झाला. साखर उद्योगाने निर्यात कोट्यात आणखी वाढ करण्याची मागणी करण्यात आली हाेती. मात्र, केंद्र सरकारने यावर अद्याप निर्णय घेतला नाही. केंद्र सरकार आता साखर निर्यातीचा कोटा वाढवण्याची शक्यता कमी असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.