krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Orange Ambia Bahar : असे करा संत्रा/मोसंबी बागेचे आंबिया बहार व्यवस्थापन!

1 min read
Orange Ambia Bahar : संत्रा आणि माेसंबीच्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी बागेची खालीलप्रकारे निगा राखावी. शास्त्रीय दृष्टीने निगा राखल्यास संत्रा/मोसंबी बागेपासून चांगले आर्थिक उत्पादन मिळवता येते. थंडी संपतेवेळी (जानेवारी - फेब्रुवारी) म्हणजे आंब्याला ज्या वेळी बहार येतो, त्यावेळी संत्रा व माेसंबीला (Orange and Mosambi) बहार येत असल्याने याला 'आंबिया बहार' ( Ambia Bahar) असे संबाेधले जाते. या बहाराचे याेग्य वेळी याेग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते.

🍊 नैसर्गिक बहार
संत्रा-मोसंबीच्या आंबिया बहाराला नैसर्गिक बहार म्हणतात. या बहारामध्ये संत्रा-मोसंबी झाडाची वाढ कडाक्‍याच्या थंडीत थांबते. डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः 10 अंश सें. खाली राहते. एवढ्या तापमानावर झाडांना ताण बसतो. या ताणामुळे झाडे खराब होत नाही. संत्रा/मोसंबीची झाडे निसर्गतः थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी-जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेत असतात. साधारणतः या काळात वातावरण पोषक नसते. झाडांवर नवीन वाढ होत नाही. त्यामुळे या विश्रांतीच्या काळात अतिरिक्त शर्करेचा संचय झाडाच्या 6 ते 9 महिन्यांच्या फांद्यांमध्ये होतो. हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यासाठी याचा उपयोग होतो.

🍊 झाडांना ताण देणे
आंबिया बहार घेण्याकरिता संत्रा-मोसंबी झाडांना ताण देणे म्हणजेच झाडांची सतत होणारी वाढ थांबविण्याकरिता संत्रा-मोसंबी झाडाला पाण्याचा पुरवठा बंद करणे हाेय. संत्रा-मोसंबी झाडांना पाण्याचा ताण दिल्यामुळे झाडांची वाढ थांबते. झाडे विश्रांती घेतात. त्यामुळे झाडांच्या फांद्यांत पानात अन्नद्रव्यांचा संचय होतो. आंबिया बहार घेण्याकरिता डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा-मोसंबी बागेचे ओलित बंद केले जाते. या ताणाचा कालावधी जमिनीचा पोत, झाडाचे वय आणि जमिनीमध्ये उपलब्ध असलेला ओलावा यावर अवलंबून आहे. आंबिया बहारासाठी हलक्‍या जमिनीत 35 ते 45 दिवस, मध्यम जमिनीत 45 ते 60 दिवस आणि भारी जमिनीत 55 ते 75 दिवस ताण द्यावा.

🍊 ताण कसा ओळखावा?
ताण सुरू करण्यापूर्वी झाडांवरील पूर्वीची फळे काढावीत. बागेचे पाणी हळूहळू कमी करीत नंतर बंद करावे. ताण सुरू केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन ती फिक्कट व नंतर पिवळी पडतात. असे होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात. साधारणपणे 25 टक्के पानगळ झाल्यास ताण बसला, असे समजावे. अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि व्यापारीदृष्ट्या हे फायद्याचे ठरते.

🍊 भारी जमिनीत आंबिया बहार घेण्यासाठी काय करावे?
काळ्या जमिनीचा थर किमान 1.20 मीटरपासून 15 मीटरपर्यंत असतो. या जमिनीत ताणावर झाडे सोडताच झाडांच्या मुळा पाण्याच्या शोधात खोलवर जातात. मुळात काळी जमीन उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे झाडांना ओलावा मिळत राहतो व झाडाला ताण बसत नाही. अशा जमिनीत बगीचा संपूर्ण ऑक्‍टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात वखरून साफ ठेवावा. डिसेंबरच्या 15 तारखेच्या आसपास झाडांच्या ओळींमधून लाकडी नांगराने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात. टोकावरची तंतूमुळे तुटून त्या ओलावा घेऊ शकणार नाहीत. परिणामी झाडे ताण घेतील. तसेच 2 मि.लि. क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे कायिक वाढ रोखणारे संजीवक आहे.

🍊 आंबिया बहार घेण्यासाठी खताचे नियोजन
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ताणावर सोडल्यानंतर त्वरीत प्रत्येक झाडाला 40 ते 50 किलो शेणखत टाकून आडवी आणि उभी वखरण करावी. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तापमान वाढताच हलके ओलित करावे. ताण तोडताना हलक्‍या ओलिता अगोदर प्रत्येक झाडाला 600 ग्रॅम नत्र + 400 ग्रॅम स्फुरद + 400 पालाश आणि भरखते द्यावीत. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी (चिंबवणी) द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यावर 20 ते 25 दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावा. हलक्‍या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.

🍊 झाडांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो?
बुरशीला स्वतःचे पोषण करण्यासाठी झाडात असलेली अन्नद्रव्ये खाणे गरजेचे असते. हीच अन्नद्रव्ये खाऊन बुरशीची वाढ होत असते. मात्र, बुरशीचा झाडावर नेमका कसा प्रादुर्भाव होतो याचे एक विशिष्ट प्रकारचे चक्र असते. ते कसे काम करते हे पाहुया!
✳️ वातावरणात बुरशीचे बिजाणू ( स्पोअर्स ) असतातच. हे बिजाणू झाडाच्या पानावर येऊन बसतात. ही फक्त एक सुरुवात असते.
✳️ पानावर स्थिर झाल्यानंतर ही बुरशी एक चिकट पदार्थ बाहेर टाकते. ज्यामुळे हे बिजाणू पानाला घट्ट चिकटून बसतात. परिणामी, जोरदार पावसातदेखील ही बुरशी पानापासून वेगळी होऊ शकत नाही.
✳️ यानंतर बुरशीची वाढ सुरू होते. सर्वप्रथम हे बिजाणू पानातील पाणी घ्यायला सुरुवात करतात. बियांपासून जसे अंकुर फुटतात, तशाच पद्धतीने बुरशीच्या बिजाणूपासून बुरशीचा जन्म होतो. या नवीनच जन्म झालेल्या बुरशीला अन्नाची फार गरज असते. ही बुरशी अन्न मिळवण्यासाठी बारीक धाग्यासारखे तंतू ( hyphae ) इतस्ततः पसरवण्यास सुरुवात करतात. हे तंतू विशिष्ट प्रकारचे द्रव बाहेर टाकतात, जेणेकरून झाडाचा तो भाग बुरशीसाठी खाण्यायोग्य होईल. यामुळे झाडाला मोठ्या प्रमाणात इजा होते.
✳️ त्यानंतर हे तंतू झाडाच्या आतील भागांत प्रवेश करून हल्ला करतात. एखादी जखम किंवा पर्णछिद्रे यामधून देखील ते तंतू प्रवेश करतात. यानंतर ही बुरशी पेशींच्या आत किंवा दोन पेशींच्या मधील भागातून वेगाने वाढायला सुरुवात होते. यालाच आपण बुरशीचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग झाला असे म्हणतो.
✳️ यानंतर हीच बुरशी नवीन बिजाणू तयार करते आणि हे बिजाणू पानाच्या पृष्ठभागावर देखील तयार होतात. हेच बिजाणू पुन्हा हवेद्वारे इतरत्र उडून नवीन झाडांवर हल्ला करतात.
✳️ हे चक्र असेच सुरू राहते. म्हणून आपल्याकडे बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास ती बुरशी कोणत्या अवस्थेला आहे, याचा विचार करून स्पर्शजन्य की आंतरप्रवाही यापैकी कोणते एक किंवा दोन्हीही बुरशीनाशक फवारणीसाठी वापरावे. हा विचार करून काम केल्यास आपले काम अतिशय प्रभावी होईल व अनावश्यक फवारणीचा खर्च वाचून बचत हाेईल.

कृषिसाधना....

1 thought on “Orange Ambia Bahar : असे करा संत्रा/मोसंबी बागेचे आंबिया बहार व्यवस्थापन!

  1. संत्रा आंबिया बहार फोडणीकरिता खत व फवारणीचे व्यवस्थापन कसे करावे हे स्पष्टपणे माहिती असणे गरजेचे आहे त्याकरिता आपण सविस्तर माहिती द्यावी तसेच आंबिया बहार टिकवताना व फुटताना खर्च वर नियंत्रण कसे राहील हे सुद्धा आपण स्पष्ट करावे जेणेकरून खर्च व उत्पन्न ही तफावत दिसायला पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!