krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

जागतिक हवामान बदलाच्या तडाख्यात शेतीतमधील बदल अतिशय आवश्यक!

1 min read
सन 1955 नंतर पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या तापमानामध्ये 0.5 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे आय.पी.सी.सी. या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे प्रकाशित अहवालामध्ये नमूद केले आहे. त्यात 1998 हे 20 व्या शतकातील सर्वात उष्ण वर्ष असल्याचे तसेच सन 1998 पासून पुढे जागतिक तापमानामध्ये वेगाने वाढ होत असल्याचेही नमूद केले आहे. अशा वाढत्या तापमानाच्या स्थितीचा पिकांच्या वाढीवर आणि शरीरशास्त्रीय क्रियांवर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. त्याचा विचार भविष्यातील शेतीसाठी करणे आवश्यक आहे.

वायूंचे वाढते उत्सर्जन

वाहनांची वाढती संख्या, कारखाने, घर किंवा कार्यालयांमध्ये वातानुकूलनाच्या यंत्रणा यातून मोठ्या प्रमाणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन होत आहे. वाहने आणि कारखान्यांतून होणारे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन, पशुपालनातून मिथेन वायुचे उत्सर्जन, शेतामध्ये होणारा नत्रयुक्त खतांचा वाढता वापर यामुळे होणारे नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन सातत्याने वाढत आहे. एका बाजूने वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत असताना कार्बन डायऑक्साइड शोषण करणारी वने, जंगले वेगाने कमी होत आहेत. आशिया खंडातील 60 दशलक्ष हेक्टरमधील जंगले मानवाद्वारे नष्ट केली गेली आहेत. 

तापमानवाढ व त्याचे परिणाम

हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू सूर्यप्रकाशापासून मिळणारी ऊर्जा व उष्णता धरून ठेवतो. परिणामी, पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान वाढत आहे. या प्रक्रियेला जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. हवेचे तापमान वाढल्यानंतर हवेचा दाब कमी होतो. वारा जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहतो. या प्रक्रियेमध्ये बाष्पही वाहिले जाते आणि हवेचे दाब कमी असलेल्या ठिकाणी पाऊस आणि अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढते. ज्या ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा कमी राहते, तिथे हवेचे दाब वाढतात. परिणामी, त्या भागात दुष्काळी परिस्थिती ओढवते. अतिवृष्टी किंवा दुष्काळ या दोन्ही स्थितीमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान होते. अलीकडे अशा बाबी सातत्याने होताना दिसत आहेत. काही कालावधीत उदा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात होणारी गारपीट आणि पाऊस यामुळेही नुकसान होत आहे. या स्थितीपासून पिकांचा बचाव करण्यासाठी काय उपाययोजना किंवा व्यवस्थापनामध्ये बदल करता येतील, 

याचा विचार करूया! …..

पर्यायी शेती व्यवस्थापन : पीक पद्धतीत बदल

कापूस पिकाचे क्षेत्र कमी करून तिथे तूर, सोयाबीन, मका, घेवडा, मिरची या पिकांचा पीक पद्धतीत समावेश करावा. महाराष्ट्रामध्ये कापूस पिकाखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. या पारंपरिक पिकामध्ये बीटी, तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, विद्राव्य खतांचा वापर यामुळे उत्पादनामध्ये बऱ्यापैकी वाढ मिळाली आहे.  प्रत्यक्षात कापूस पिकाचा कालावधी 7 ते 7.5 महिन्यांचा आहे. आपल्याकडील मॉन्सूनचा कालावधी चार महिन्यांचा आहे. हे पाऊसमान आणि कपाशीचा कालावधी जुळत नाही. त्यातच कपाशीचे 94 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. कपाशीच्या वाढीच्या काळात गरजेनुसार पाऊस किंवा सिंचन शक्य न झाल्याने कपाशीची महाराष्ट्रातील सरासरी उत्पादकता केवळ 2.93 क्विंटल प्रति हेक्टर इतकी कमी आहे. उत्पादनाचा खर्च वाढत असताना आणि उत्पादकता कमी राहत असल्याने कपाशी उत्पादकांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ होत आहे. राज्यातील कपाशीखालील 40 लाख हेक्टर क्षेत्रांपैकी 20 ते 30 लाख हेक्टर क्षेत्र कमी करून तेथे तूर, सोयाबीन, मका, घेवडा, मिरची या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे.

रुंद वरंबा व सरी पद्धतीचा वापर 

मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा-सरी पद्धतीचा वापर वाढविणे गरजेचे आहे. या पद्धतीने सोयाबीन व घेवडा या दोन्ही पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यातून हेक्टरी उत्पादकता वाढण्यास मदत होईल.

रब्बी ज्वारीसाठी बंदिस्त वाफे 

पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे वाफे तयार करावेत. जमिनीच्या उतारानुसार वाफ्याचा आकार ठेवावा. वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये नांगराने योग्य अंतरावर दंड व पाट टाकावेत. त्यामुळे कमी खर्चात बंदिस्त वाफे तयार करता येतात. या वाफ्यात पावसाचे पाणी मुरते. योग्य ओलीवर पेरणी केल्यास पुन्हा होणाऱ्या पावसाचे पाणी ज्वारीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीने हेक्टरी उत्पादनामध्ये 30  टक्के वाढ होत असल्याचे प्रयोगांचे निष्कर्ष आहेत. ही मूलस्थानी जलसंधारणाची पद्धत रबी ज्वारीसाठी उपयुक्त आहे.

हरभरा पिकाखालील क्षेत्रात वाढ करणे

हरभरा हे रबी पीक असून, ते कमी पावसावर व कमी पाण्यावर येणारे पीक आहे. जिथे दोन पाणी उपलब्ध असतील, तेथे बागायत हरभऱ्याची लागवड करावी. कोरडवाहू हरभऱ्याची लागवड ऑक्टोबर महिन्यात करून सारे पाडावेत. या साऱ्यांमध्ये पावसाचे पाणी मुरून हरभऱ्याची उत्पादकता वाढेल.

सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब 

सिंचनासाठी ठिबक सिंचन वापरल्यास पाणी वापरामध्ये 50 टक्के बचत होऊ शकते. सध्याच्या बागायत क्षेत्रात दुपटीने वाढ शक्य आहे. शक्य तिथे बंद पाईपने पाणीपुरवठा योजना राबविणे हीच काळाची गरज आहे. ठिबक सिंचन पद्धतीने कमी पाण्यात द्रवरूप खते देणे शक्य होते. परिणामी, पिकांद्वारे उत्तम शोषण होऊन अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते. पाण्यामध्येही 50 टक्के बचत शक्य होईल.

संरक्षित शेतीचा अवलंब करणे

हवामानापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेडनेट किंवा हरितगृहांमध्ये लागवड उपयुक्त ठरू शकते. त्यात ढोबळी मिरची, जरबेरा, कार्नेशन, गुलाब, टोमॅटो अशा पिकांची लागवड सध्या केली जाते. आर्थिकदृष्ट्या शक्य असलेल्या शेतकऱ्याने किमान 10 गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊसची उभारणी करण्याचा प्रयत्न करावा. त्यात ठिबकद्वारे पाणीपुरवठा, विद्राव्य खतांचा वापर योग्य व्यवस्थापन पद्धती या द्वारे उत्तम दर्जाचे व अधिक उत्पादन घेणे शक्य आहे.

आंतरपीक पद्धतीचा अवलंब

लागवडीसाठी एक पीक पद्धतीपेक्षा आंतरपीक पद्धती निश्चितपणे फायद्याची आहे. मुख्य पिकाशिवाय आंतरपिकाचे उत्पादन मिळत असल्याने जोखीम कमी होते. कोरडवाहू क्षेत्रात बाजरी + तूर (2:1), सोयाबीन + तूर, कपाशी + मूग किंवा उडीद अशी आंतरपिके घेणे फायद्याचे ठरते. बागायती क्षेत्रात ऊस + बटाटा किंवा भुईमूग, ऊस + हरभरा, ऊस + कांदा, ऊस + फुलकोबी किंवा कोबी घेता येतील.

आच्छादनांचा वापर करणे 

कोरडवाहू क्षेत्रात पाच टन आच्छादनांचा वापर करून बाष्पीभवनाचा वेग रोखता येणे शक्य आहे.  तसेच उन्हाळी हंगामात फळबागांमध्ये आच्छादन गरजेचे आहे.

प्रकाश परावर्तकांचा वापर 

केओलीन या प्रकाश परावर्तकाची 8 टक्के प्रमाणात फवारणी केल्यास पानांद्वारे होणाऱ्या बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी करता येतो. फळपिकांसाठी पाणीटंचाईच्या काळात ही पद्धत उपयोगी ठरते.

जलयुक्त शिवार व जलसंधारण

गाव, शिवारात माथा ते पायथा जलसंधारणाची कामे, साखळी बंधारे, शेततळे यातून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे शक्य आहे. किमान दोन हंगामांसाठी पाण्याचे नियोजन करण्यासोबत वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. सोबतच कोरडवाहू भागातील जनावरांच्या चाऱ्याचीही उपलब्धता होते.

कृषिसाधना....

4 thoughts on “जागतिक हवामान बदलाच्या तडाख्यात शेतीतमधील बदल अतिशय आवश्यक!

  1. भविष्यातील समस्यांची जननी….. माणसाने आतातरी विकासाचे हपापलेपण सोडून निसर्गाला शरण जावून वाचण्याचे मार्ग शोधावे…..
    उत्तम लेख! 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!