Rain forecast : पावसाचा जोर काहीसा ओसरणार
1 min read
Rain forecast : दसऱ्यानंतरच (दि. 2 ऑक्टाेबर) अपेक्षित उघडीप देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ वगळता आजपासूनच (दि. 29 सप्टेंबर) उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अशा 18 जिल्ह्यातून पावसाचा (Rain) जोर काहीसा ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या 18 जिल्ह्यात पूर्णतः नव्हे परंतु काहीशा उघडीपीची शक्यता (forecast) असून, केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता सध्या जाणवते.
🌀 कोकण व विदर्भातील पाऊस
मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात मात्र दसऱ्यानंतरही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
🌀 आगाऊ उघडीपीची शक्यता कशामुळे?
महाराष्ट्रावरून पाऊस पाडत सरकलेले हवेचे कमी दाब क्षेत्र आज सौराष्ट्रात पोहोचले आहे. ते पुढील 24 तासात अरबी समुद्रात उतरून पुन्हा तीव्र कमी दाबात रूपांतर होवून ओमानकडे मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.
🌀 परतीचा पाऊस अजूनही जागेवरच
देशात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सून शुक्रवार (दि. 3 ऑक्टोबर)पर्यंत गुजरातमधील वेरावळ, भरूच, मध्य प्रदेशातील उज्जैन, उत्तर प्रदेशातील झाशी शहाजहानपूर या शहरादरम्यानच्या सीमारेषेवर पुढील पाच दिवस जागेवरच थबकण्याची शक्यता जाणवते.
🌀 शेतीच्या कामांना चालना मिळू शकते काय?
उघडीपीच्या शक्यतेमुळे कांदा बियाणे टाकणी, खरिपातील मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग व अति आगाप धान सारख्या पिकांची काढणी, द्राक्षे बाग छाटणी, वाफस्या नंतरच्या भाजीपाला पीक काढणी, हरभरा व ज्वारी पेरणी, रब्बीच्या पुढील इतर लागवडीसाठीची रान तयार करणे इत्यादीसारख्या शेतकामांचा शेतकामांना चालना मिळू शकते, असे वाटते. अर्थात हवामान विभागाच्या अंदाजाचा कानोसा घेऊनच निर्णय घ्यावा.
🌀 अंदमानजवळील कमी दाबक्षेत्र वायव्येकडे सरकणार
मंगळवार (दि. 30 सप्टेंबर) दरम्यान अंदमानजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती व त्यानंतर त्याच्या उत्तर व उत्तर मध्य भारताकडे मार्गक्रमणाच्या शक्यतेतून महाराष्ट्रात दि. 8 व 9 ऑक्टोबर दरम्यानच्या झोडापण्या स्वरुपाच्या रब्बी पावसाच्या चौथ्या आवर्तनाचा अपेक्षित धोका सध्या तरी कमी होईल, असे वाटते. या व्यतिरिक्त वातावरणात काही बदल झालाच तर सूचित केले जाईल.