Nematode Management : सुत्रकृमी व्यवस्थापनाकरीता सेंद्रिय द्रव्याचा वापर करा!
1 min read🌐 नुकसानीचे दृश्य चिन्हे
प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा पिकांना सुत्रकृमी पिकांना मुळीच मारीत नाही तर, त्याचे बरोबर सहजीवन जगतात. परिणामी, पिकाचा जोमदारपणा कमी होत जातो. सुत्रकृमी मुळावर वाढत असल्याकारणाने मुळाची नैसर्गिक वाढच विस्कळित होते. त्यामुळे मुळाची वाढ खुंटून पोषक मुळ्या कमी होतात. पोषक मुळ्यांना इजा पोहचल्यामुळे पिकाचे सर्वसाधारण परिस्थितीत होऊ शकणाऱ्या जल व अन्न शाेषणाच्या क्रियेत अडथळा येतो. सुत्रकृमी आपल्या मुखाकडील सोडेसारख्या अवयवाद्वारे मुळाच्या पेशिका आवरणाला छिद्रे पाडून आत धातूक द्रव्ये सोडतात. त्यामुळे बाह्य आवरणात फुगीरपणा निर्माण होऊन झाड खुजट होऊन सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरतेची चिन्हे त्यात दिसू लागतात. परिणामी, कधी कधी झाड अकस्मात सुकून मरतात. ही स्थिती विषेशतः वातावरणातील तापमान जास्त झाल्यानंतर होते. कधी कधी मुळावर सुजल्यासारख्या गाठी उद्भवतात. परिणामी पाने पिवळी पडतात. विषेशतः पानवेली व कनिसावरील रोगाच्या वाढीत या सुत्रकृमीमुळे मदत होते.
🌐 व्यवस्थापन
पिकाच्या मुळावरील सुत्रकृमीच्या व्यवस्थापनाकरीता प्रभावी व व्यवहारिक पद्धत अजून निघाली नाही. पिकाची फेरपालट केल्याने सुत्रकृमीच्या व्यवस्थापनास मदत होते. निंबोळी अथवा करंजीच्या पेंडीचा वापर केल्याने सुद्धा नियंत्रणासोबत जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. भाजीपाल्याच्या पिकांवर तृणधान्य पिके घेणे सुद्धा फायदेशीर ठरते.
🌐 रासायनिक व्यवस्थापन
व्यवस्थापनाच्या रासायनिक पद्धती म्हणजे मशागतीच्या सुधारीत पद्धतीचा अवलंब उदा. सेंद्रिय/रासायनिक भूसुधार द्रव्याचा वापर यामुळे जमिनीतील स्थितीच्या हालचालीत बदल होणे वगैरे जरी रासायनिक उपचाराइतके प्रभावी व त्वरीत होणारे नसले तरी त्याच्यामुळे जमिनीतील सुत्रकृमीची संख्या मर्यादित पातळीवर राहण्यास मदत होते. या पद्धतीचा वापर उष्णदेशीय व मध्यम उष्णदेशीय प्रदेशातून आणि भाजीपाल्यासारख्या पिकासाठी जास्त अनुकूल होईल.
🌐 विविध तेलबियांच्या पेंडी किंवा ढेपेचा वापर
भाजीपाला लागवडीत जमिनीचा कस कायम राखण्यासाठी विविध तेलबिया ढेपीचा वापर करणे, त्याचप्रमाणे निंबोळी ढेप प्रति हेक्टरी 1,500 किलो या प्रमाणात पिकाची लागवड करण्यापूर्वी 2 ते 3 आठवडे आधी जमिनीत मिसळल्याने सुत्रकृमीचे नियंत्रण होऊन जमीन सुधारण्यास मदत होते. करंज, एरंडी, भुईमुग, जवस, मोहरी या तेलबिया पिकाच्या पेंडीमुळे मुळावर गाठी निर्माण करणाऱ्या सुत्रकृमीची तीव्रता कमी करण्यास मदत होते. अश भूसुधार सेंद्रिय द्रव्यामुळे पिकांच्या मुळावरील गाठीवरील सुज तर कमी होईलच शिवाय, उतकातील सुत्रकृमीची संख्या त्याच्या मादीची अंडी घालण्याची क्षमता कमी होण्यास मदत होईल. आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास निंबोळी पेंडीचा वापर शेतकऱ्यांना लाभदायक होईल. परंतु, सर्वत्र जमिनीत सारख्याच प्रमाणात प्रभावी होईल, असे सांगता येणार नाही. ज्या जमिनीत सेंद्रिय द्रव्याचा अंश कमी आहे, तेथे तेलबियांच्या वापरामुळे कमतरता होणे संभव असते. त्यामुळे त्यापुढील पिकही आर्थिकदृष्ट्या परवडणारी तेलढेप ज्यात पोषक अन्नद्रव्याचे प्रमाण जास्त असते. शिवाय तिचे वापराने किटकांना दूर ठेवणेही शक्य होते. अश निंबोळीची पेंड वापरून पिकाच्या मुळावरील गाठी निर्माण करणाऱ्या सुत्रकृमीचे नियंत्रण करण्याचे कार्य जास्त प्रभावी होईल.
🌐 हिरवळीच्या पिकाचा बिवड तयार करणे
ही पूर्वापास रचलित पद्धत असून, जमिनीतील पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा होऊन जमिनीची पोत सुधारते व पुढील पिकास त्याचा लाभ मिळतो. अशा पद्धतीत जमिनीत ज्या सेंद्रिय द्रव्याचा पुरवठा होते. त्यांचे विघटन क्रियेमुळे जमिनीत महत्त्वाचे प्राकृतिक, रासायनिक, जैविक बदल घडून येतात. तसेच जमिनीत त्यामुळे सूक्ष्मजिवी (प्राणिज्य व वनस्पती) क्रियाशील राहतात. सर्वसाधारणपणे यासाठी वापरली जाणारी पिके ताग, ढेंच्या, शेवरी त्यांच्या फुलोऱ्यावर येण्याच्या आत जमिनीत गाडल्याने भेंडी व टोमॅटो पिकाच्या मुळावरील सुत्रकृमीचे नियंत्रण बऱ्याच प्रमाणात होऊ शकते असे आढळून आले आहे. या पिकाचे
लागवडीपूर्वी दोन ते तीन आठवड्यापूर्वी हेक्टरी आठ टन पाला वापरल्यास लाभदायक परिणाम आढळून आले आहे.
🌐 पिकाचे अवशेषाचा वापर
पिकाचे अवशेष जमिनीत गाडल्याने जमिनीतील पुष्ठभागावरील वातावरणात पेशीकामय पदार्थाची भर पडते. लाकडाचा भुसा हेक्टरी 25 क्विंटल क्रियेमुळे निर्माण होणारी नत्राची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने फारच उच्च असल्याने त्याची भरपाई नत्रयुक्त खताचा वापर करून करावी. दर हेक्टरी 60 किलो पेक्षा जास्त नत्राची गरज लागवडीच्या वेळी ज्या ठिकाणी लाकडाचा भुसा वापरला आहे अशा जमिनीत वापरणे जास्त हितकारक ठरू शकते. तथापि, अधिकधिक लाभ व सुत्रकृमी गस्त नियंत्रणासाठी हेक्टरी 120 किलो नत्र ज्या ठिकाणी लाकडाचा भुसा वापरला आहे, अश जमिनीत वापरणे जास्त हितकारक ठरू शकते. जास्त प्रमाणात नत्राचा वापर जमिनीत पिकाची काईक म्हणजे पर्निय वाढ होण्यास मदत करते आणि किडींच्या संख्येत वाढ होते. तरी, नत्राचा वापर योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे ठरते.
🌐 सेंद्रिय द्रव्याने जमिनीत काय बदल घडतात
जमिनीत तेल पेंड किंवा लाकडाचा भुसा वापरला, तेथे सुत्रकृमीचे नियंत्रण खालील प्रमाणे होते.
❇️ जेथे सुत्रकृमीचा प्रादुर्भाव होते अशा जमिनीत सेंद्रीय द्रव्याच्या वापराणे जमिनीच्या आम्लविम्ल निर्देशकात तसेच जमिनीच्या नत्र पातळीत बदल होऊन अशी स्थिती सुत्रकृमीच्या हालचालीस प्रतिकूल होते.
❇️ सेंद्रिय भूसुधार द्रव्याच्या वापराने जमिनीची प्राकृतिक व रासायनिक घडण सुधारते. परिणामी, सुत्रकृमीचे विकासास व हालचालीस आळा घालण्यासाठी पिकाची प्रतिकार शक्ती वाढते. पिकाचे मुळांची जलद वाढ होण्याच्या दृष्टीने रोगग्रस्त मुळे निघून जाऊन त्याऐवजी नवीन मुळे फुटतात व त्यामुळे सुत्रकृमीमुळे झालेले पिकाचे नुकसान भरून अनुकूल परिस्थिती निर्माण होते. भूसुधार द्रव्याच्या वापराणे जमिनीतील फेनोलिक द्रव्ये टोमॅटोच्या मुळाकडून शाेषली जातात. अशा पिकांच्या मुळात फारच थोड्या सुत्रकृमीच्या अळ्या शिरकाव करू शकतात. पुढे त्या पूर्ण विकसित मादी स्थितीपर्यंत पाेहचू शकत नाही. परिणामी फारच कमी प्रमाणात अंडी घालू शकतात.
यावरून सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी भूसुधार द्रव्याचा वापर हा समशिताेष्ण उष्णदेशीय व मध्यम उष्णदेशीय प्रदेशातून लाभदायक होतो, असे आढळून आले आहे. अर्थात हा परिणाम जमिनी जमिनीनुसार प्रदेश प्रदेशानुसार वेगवेगळा राहील. या साठी विविध कृषी हवामानानुसार अभ्यास पाहणी करून कोणते सेंद्रिय पदार्थ वापरावे. ते किती लाभदायक होईल व त्याचा वापर किती प्रमाणात व कोणत्या पद्धतीने वापरावे हे ठरवावे लागते. यामुळे व्यवस्थापनाच्या खर्चात निश्चित बचत करता येईल. शेतकऱ्यांनी ही गोष्ट सोयीस्कररीत्या लक्षात घेणे आवश्यक आहे. रासायनिक व अरासायनिक उपायांचा अवलंब, त्याच बरोबर जोडीने झाला पाहिजे. जेथे शक्य तेथे प्रथम रासायनिक द्रव्याचा वापर करून सुत्रकृमीची संख्या व तीव्रता खाली आणणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचा पूर्ण प्रादुर्भाव व संख्या गुणन समस्या सेंद्रिय भूसुधार द्रव्याचा सतत वापर करून सोडविता येतील.