krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

राजे हो, जागे व्हा…! अन्यथा भारताचा श्रीलंका होणार!!

1 min read
भारतात राजे उदार आणि शेतकरी बेजार अशी अवस्था असून, भारताची वाटचाल श्रीलंकेकडे आहे हे निश्चित राजसत्ता मिळवण्यासाठी कुणी फुकट धान्य (Grain) देणार, कुणी फुकट घर (House) देणार, तर कुणी देतय फुकटचे गॅस सिलिंडर (Gas Cylinder). देशातील सारे राजे झाले उदार, पण त्यांच्या नियोजनावर नाही तर शेतकऱ्याच्या जीवावर.

🧑‍🦳 सत्तेसाठी शेतीचा बळी
जगातील इतर देशात राज्य कमवण्यासाठी एक तर युद्ध (War) केली जातात किंवा देशहिताची कामे केली जातात. परंतु, सन 1977 नंतर भारतीय राजकारणाचे गणितच बदलले. साऱ्या जनतेला (Citizen) म्हणजे गरीब असो की करोडपती, साऱ्यांनाच शेतमाल फुकट दिला की, राज्य मिळते. हे किती दिवस चालेल? त्यामुळे जगातील कोणत्याही युद्धात मारले गेले नाहीत किंवा महामारीत देखील मारले गेले नाहीत, तेवढ्या शेतकऱ्यांनी (Farmer) भारतात आत्महत्या (Suicide) केल्यात. शेतकऱ्यांचे मुलांचे लग्न (Marriage) होत नाहीत, थोडक्यात काय तर शेती व्यवसाय मारला.

🧑‍🦳 सरकारी नोकरीचे मृगजळ
सरकारी नोकरी (Government jobs) म्हणजे उत्पन्नाचे हमखास स्त्रोत (Main source of income). यामुळे सारे त्या मृगजळामागे धावत आहेत. त्यासाठी आरक्षण (Reservation) मिळावे, ही रास्त मागणी. पण त्याने प्रश्न सुटणार आहेत का? काही हजार फक्त नोकऱ्या, पण कोट्यवधी रोजगार (Employment) देण्याची ताकत फक्त आणि फक्त कृषिक्षेत्रातच (Agriculture sector) आहे. सरकारने गेल्या कित्येक वर्षात सरकारी नोकर भरती केली नाही, थोड्या फार जागा भरण्यासाठी घोषणा होतात. पण त्या प्रक्रियेत काही त्रुटी मुद्दाम ठेवायच्या. म्हणजे कुणी तरी अन्याय झाला म्हणून कोर्टात Court) जाणार. कोर्टात गेले की, ते स्थगिती (Stay order) मिळणार. मग पुढे चार ते पाच वर्ष भरती करायची गरज नाही.

🧑‍🦳 सरकारी कामे व आरक्षण
जी काही सरकारी कामे होत आहेत, ती एकतर जॉब वर्कवर (Job worker) किंवा कंत्राटी पद्धतीने (On a contractual basis) केली जात आहेत. त्यामुळे ज्यांना आरक्षण आहे, त्यांनाही फायदा नाही व जे मागत आहेत त्यांना तर दूर दूर पर्यंत फायदा दिसत नाही. अर्थात तो ज्यांचा हक्क आहे, त्यांना मिळावा हीच इच्छा. देशातील 65 टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. त्यांना शेतमालास भाव (Commodity prices) मिळाला, तर आणि तरच ते जगू शकतील. याला एकच मार्ग त्याला जीवन जगण्यासाठी योग्य तो नफा मिळाला, तर ना कुणी शेती सोडेल ना कुणी नोकरी मागेल.

🧑‍🦳 श्रीलंका व भारतातील धोरणात साम्य
आज श्रीलंकेचा महागाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. कारण काय?…चुकीचे कृषीविषयक धोरण! (Wrong agricultural policy) श्रीलंकेने शेतीत संपूर्ण रासायनिक खत (Fertilizer) वापर बंद करून नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला, परिणामी, सबब शेतमालाचे उत्पादन घटले. श्रीलंकेतील जनतेला पुरेल एवढे अन्नधान्य (Grain) सोडा, भाजीपाला (Vegetables) मिळणे देखील अवघड झाले आहे. कोणताही बदल करण्याचा टोकाचा निर्णय हा आत्मघाती (Suicidal decision) ठरतो, हे यावरून स्पष्ट दिसते. बदल हे हळु हळू आणि दुसरा पर्याय निर्माण करून करायचे असतात. भारतात देखील नैसर्गिक शेती करावी व रासायनिक खते वापरू नयेत, यासाठी काही तज्ज्ञ मंडळी मत मांडत आहेत. जर त्यांचे 100 टक्के ऐकले तर निश्चितच भारताचा श्रीलंका होणार. श्रीलंका हा लहान देश आहे.महागात खरेदी करून का असेना त्यांची अन्नधान्याची सोय होईल, पण, भारताला 130 कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरवणे कसे शक्य होईल?

🧑‍🦳 सुवर्ण मध्य साधा
रासायनिक खते (Fertilizer) व कीटकनाशक (Pesticides) यांचा वापर मर्यादित करून विषमुक्त अन्न उत्पादन करणे येथपर्यंत निश्चितच योग्य आहे. त्यामुळे उत्पादन व आरोग्य दोघांचा समन्वय साधला जाईल. यासाठी शेतीतून येणाऱ्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने नियोजन केले तर निश्चित सुवर्ण मध्य साधला जाईल. अन्यथा आपणही यादवीपासून दूर नाही. सन 2017 मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी फक्त काही दिवस संपावर गेला असता भीषण अवस्था झाली होती. शेतकरी जर काही महिने संपावर गेला तर काय गत होईल, ह्याची कल्पना न केलेली बरी! म्हणून म्हणतो, राजे सावध व्हा व देश वाचवा. देश फक्त नोकरदार किंवा राज्यकर्ते चालवत नसून, शेतकरी चालवतात,याची जाणीव ठेवा, म्हणजे संकटे येणार नाहीत.
जय जवान 👮🏻‍♂️ जय किसान 👳‍♂️

2 thoughts on “राजे हो, जागे व्हा…! अन्यथा भारताचा श्रीलंका होणार!!

  1. खूपच सुंदर लेख…
    सर्वांनी यावर विचार करून योग्य अंमलबजावणी करावी अन्यथा संकट दारापर्यंत पोहचलेले आहेच ते घरात घुसून हावी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!